पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे गद्दार असून, त्यांनी काही मोजक्या उद्योजकांच्या हितासाठी देशहीतही विकले आहे,” असे वादग्रस्त वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी रायबरेली येथील बहुजन स्वाभिमान सभेत केले. स्वातंत्र्य सैनिक वीरा पासी यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.






यावेळी राहुल गांधी म्हणाले, ”ज्यावेळी रा. स्व. संघाचे स्वयंसेवक तुमच्याकडे येतील आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत बोलतील तेव्हा तुम्ही त्यांना हे आवर्जून सांगा की, त्यांची संघटना, मोदी आणि शहा हे गद्दार आहेत. ते आपला देश विकायला निघाले असून; रा. स्व. संघ आणि भाजप हे रोजच्या रोज राज्यघटनेवर हल्ला करत आहेत, अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा आवाज असलेल्या या दस्तऐवजाचे संरक्षण करणे नितांत आवश्यक आहे,” ‘मनरेगा’सारख्या योजनेला कमकुवत करून, जातिनिहाय जनगणना न घेऊन व काही निवडक उद्योजकांना अनुकूल राहून पंतप्रधान मोदी हे घटनेवर रोज हल्ला करत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
‘इंधन बचत करावी, सोने खरेदी टाळावी आणि परदेश दौरे थांबवावेत’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते, त्यावरूनही राहुल गांधी यांनी टीका केली. ”आगामी काळात महागाई वाढणार आहे, इंढन आणि अन्नधान्याच्या किमती वाढतील,” असे राहुल म्हणाले.
मोदी पुन्हा रडतील
”कोरोना महासाथ आणि नोटबंदी वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यापद्धतीने दूरदर्शनवर रडत होते, तसेच पुन्हा एकदा रडताना लवकरच तुम्हाला दिसेल. ते पुन्हा दावा करतील की, त्याचा काही दोष नाही, पण मी तुम्हाला सांगतो की दोष हा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि रा. स्व. संघ यांचाच आहे कारण ते राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा दावा राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले देशावर जे आर्थिक परिणाम होणार आहेत, त्याचा परिणाम सर्व सामान्यांवर होईल अंबानी-अदानी यांच्यावर नाही. इंधनाच्या किमती वाढणार नाहीत असे आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते, मात्र ते पाळले गेले नाही. अंबानी-अदानी हे रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून परदेशात विकत आहेत, आणि तो पैसा मोदींसाठी वापरला जात आहे.
‘मेलोडी’ ट्रेंडवरूनही टीका
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीवरूनही राहुल यांनी मोदींवर टीका केली. ”ते मेलोनींसोबत टॉफ्या खात आहेत आणि व्हिडीओ बनवत आहेत. जणू काही हा सगळा विनोद आहे, अशा पद्धतीने ते वागत आहेत पण नंतर परत येऊन त्यांना हात जोडायची वेळ येणार आहे,” असे राहुल गांधी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.













