कोथरूडमधील जीत मैदानाजवळ असलेल्या अजय गॅस एजन्सीसमोर गेल्या तीन दिवसांपासून आम्ही पहाटेपासून रांगेत उभे आहोत. मात्र, अद्याप गॅस मिळालेला नाही. ‘आम्ही नोकरीला जावे की नाही? स्वयंपाक कसा करणार? गॅस देता येत नसेल तर सरकारने जेवणाचे डबे पुरवण्याची व्यवस्था करावी,’ अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली.






गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून दाद मिळत नसल्याने, काही नागरिकांनी थेट कोथरूड पोलीस ठाणे गाठून एजन्सीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी नागरिकांच्या भावना समजावून घेत गॅस एजन्सीशी संवाद साधला आणि वितरणामध्ये शिस्त आणण्याच्या सूचना दिल्या.
‘आम्ही तीन-तीन दिवस उन्हात रांगेत थांबलो आहोत. घरची कामे, आंघोळ आणि आजारी व्यक्तींना सोडून आम्ही येथे उभे आहोत. गॅस मिळणे तर लांबच, पण एजन्सीवाल्यांनी साधी दखलही घेतली नाही, म्हणून आम्ही पोलीस ठाण्यात आलो.’
– – ग्राहक
‘गॅस बुकिंगसाठी मी रांगेत उभा राहिलो. माझा नंबर नोंदवला गेला आणि दोन दिवसांत गॅस येईल असे सांगण्यात आले. मी ११० व्या क्रमांकावर होतो, पण साधारण ८०-९० सिलिंडर वाटल्यानंतर अचानक वाटप थांबवण्यात आले.’
– ग्राहक
‘गॅससाठी पावती दिली, पण सिलिंडर दिला नाही. ‘सिलिंडर संपले आहेत’ असे कामगार सांगतात, तर दुसरीकडे ‘आजच घेऊन जा, उद्याची माहिती नाही’ असेही म्हणतात. आता आम्ही नेमके काय करायचे?’
– – ग्राहक
‘गॅस न मिळताच तो वितरित झाल्याचा (Delivered) संदेश मला मिळाला. माझा गॅस मला मिळालेला नाही हे सांगायला गेलो, तर एजन्सीवाले ऐकायला तयार नाहीत. अक्षरशः डोके फिरायची वेळ आली आहे.’
– – ग्राहक
गॅस एजन्सीशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, “जसा पुरवठा होत आहे, तसे आम्ही वाटप करत आहोत. सध्या आणीबाणीची परिस्थिती असल्याने ग्राहकांनी सहकार्य करावे. गॅस मिळणार नाही, या भीतीने घरात सिलिंडर शिल्लक असतानाही काही लोक रांगेत उभे राहत आहेत, त्यामुळे गोंधळ वाढत आहे. वाटप अधिक सुव्यवस्थित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
कोथरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर म्हणाले की, ‘गॅस मिळेल की नाही या चिंतेने लोक व्यथित झाले आहेत. वितरणामध्ये गोंधळ होऊ नये यासाठी आम्ही सर्व गॅस वितरकांची बैठक बोलावण्याच्या विचारात आहोत. कोणालाही न डावलता वितरण सुरळीत व्हावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.’













