भाजपमध्ये राज्यसभेसाठी ‘भाऊगर्दी’, दिल्लीत अंतिम निर्णय! यांच्या नावावर शिक्कामोर्तब? ५ नावे चर्चेत

0

महाराष्ट्रातून येत्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या सात जागांसाठी राज्यसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १६ मार्चला मतदान होणार असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः भाजप पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, पक्षातील खऱ्या निष्ठावंतांना संधी मिळावी, या मागणीसाठी पक्षातील एक गट सक्रिय झाला आहे.

पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत बाहेरून आलेल्या ‘आयाराम’ नेत्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेच्या जागा दिल्या गेल्या. आता मात्र पक्षाच्या दीर्घकाळ निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जावे, अशी त्यांची भूमिका आहे. यासाठी पक्षांतर्गत प्रयत्न सुरू झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  हडपसर अवैध दारूकडे दुर्लक्ष महागात माहिती असूनही कारवाई नाही पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

पाच प्रमुख नावांची चर्चा

भाजपकडून राज्यसभेसाठी पाच प्रमुख नावांची चर्चा समोर आली आहे. यात डॉ. विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांच्या नावांवर पक्षातील विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे पक्ष सूत्रांकडून कळते. यापैकी धैर्यशील पाटील आणि भागवत कराड हे सध्याचे राज्यसभा सदस्य असून, त्यांचा कार्यकाळ संपत आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य म्हणजे शरद पवार (शरदचंद्र पवार गट), रामदास आठवले (रिपब्लिकन पक्ष), फौजिया खान (शरदचंद्र पवार गट), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे गट), धैर्यशील पाटील (भाजप) आणि भागवत कराड (भाजप) असे सात जण आहेत. यातील भाजपचे दोन सदस्य रिक्त होत असल्याने पक्षाला या जागा टिकवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत.

अधिक वाचा  केंद्र सरकारला वित्तीय शिस्तीत चांगले गुण; वित्तीय तूट ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत रोखण्यात खर्चात कपातीमुळे यश

मतदान प्रक्रिया कधी?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे. ६ मार्चला अर्जांची छाननी होईल, तर ९ मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल तत्काळ जाहीर केले जातील.

राज्याच्या राजकारणात रंगत

राज्यसभेच्या या निवडणुकीत महाराष्ट्र देशातील सर्वाधिक जागांसाठी निवडणूक घेणारा राज्य ठरला आहे. भाजपने निष्ठावंतांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरत असताना, इतर पक्षही आपल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करत आहेत. मात्र सध्या तरी सर्वांच्या नजरा भाजपच्या अंतिम उमेदवार यादीकडे लागल्या आहेत. पक्षातील इच्छुकांची ‘भाऊगर्दी’ आणि निष्ठावंतांसाठी सुरू असलेला प्रयत्न यामुळे आगामी काही दिवस राज्याच्या राजकारणात रंगत येणार आहे.

अधिक वाचा  पंजाबमध्ये भाजपचा दणदणीत पराभव! ‘आप’चा 900 जागांवर विजय, काँग्रेस ही दुसरे स्थान मिळवत समाधानी?