मुंबई दि. ७ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समिती संलग्न मध्यवर्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा १२८ वा जयंती महोत्सव उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.






सदर प्रसंगी अध्यक्ष महोदयांनी माता रमाई व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार गुरुजी सरचिटणीस मनोहर बा. मोरे गुरुजी यांनी धार्मिक पूजा पठण आपल्या मधुर वाणीने पार पाडला. महिला मंडळाच्या सरचिटणीस सौ. अंजलीताई मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना माता रमाईच्या जीवनातील अनेक घटना सर्वांसोबत सामायिक केल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्त्या कु. क्षमिता संजय पवार (शिक्षिका) यांनी माता रमाईवर आपले विचार मांडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला लंडन वरून पाठवलेल्या पत्राचा भावार्थ समजावून सांगताना त्याच्या आशयाचे ज्याप्रकारे निरूपण केले ते ऐकून उपस्थित महिला मंडळाचे डोळे पाणावले. मध्यवर्ती महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. सुजाता विठ्ठल पवार यांनी विचार मांडत असताना रमाईचे खडतर जीवन व त्याग उपस्थितांच्या डोळ्यांसमोर उभे करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. बौद्धाचार्या प्रतिभाताई मोहिते यांनी देखील आपले प्रभावी विचार मांडून सर्वांना मार्गदर्शन केलं. आपल्या आयुष्याची पंचाहत्तरी पार पाडून ही तरुणींना लाजवतील अश्या उत्साहाने कार्य करणाऱ्या मध्यवर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशिलाताई जाधव यांनी देखील माता रमाईच्या जीवनपटाचा आढावा घेत त्यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. समितीचे उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार यांनी माता रमाईच्या जीवनाचा आढावा घेत असताना ज्या ज्या महिलांनी विचार व्यक्त केले तसेच महिलांनी कोणत्याही जोखडाखाली न राहता बिंदास पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केली पाहिजेत असाच बौद्धजन पंचायत समितीचा हेतू असतो म्हणून माता रमाईचा आदर्श घेऊन आपण नवी पीढी घडवावी अस मार्गदर्शन केलं.
अध्यक्षीय भाषणात उपसभापती विनोद मोरे यांनी आपल्या भाषणात “त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांनी आपल्या आवडी निवडी, जीवनाचा समाजासाठी व बाबासाहेबांसाठी त्याग केला होता, त्यांनी स्वतः खडतर जीवन जगून बाबासाहेबांचा मार्ग सुकर केला होता, अनेकदा पैश्या अभावी योग्य वैद्यकीय इलाज न करता आल्याने आपल्या चार मुलांना मातीआड केलं, त्यांनी समाजासाठी व आपल्या नऊ कोटी लेकरांसाठी दुःख, यातना, वेदना, उपेक्षा सहन केलं पण त्याची झळ कधी बाबासाहेबांना पोहचू दिली नाही, एक वेळ असा ही आला की आश्रमातील लहान मुले सरकारी सुविधा न पोहोचल्याने उपाशी होती ही बातमी माता रमाईना कळताच त्या आश्रमात आल्या स्वतःच्या हातातील पाटल्या गहाण ठेवून त्यांनी मुलांसाठी अन्नधान्याची सोय केली अश्या हळव्या मनाच्या परंतु कणखर अश्या माता रमाई होत्या त्यांनी बाबासाहेबांना आयुष्यभर साथ दिली. कठीण प्रसंगी संसाराचा गाडा एकहाती खेचत उपाशीपोटी राहून त्यांनी संसार केला, शेन्या-गोवऱ्या विकून त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांना आर्थिक मदत पुरवली, म्हणून रमाईच्या जयंती प्रसंगी सर्वांनी त्यांचे विचार, आदर्श याचे अनुसरण करीत आपली नवीन पिढी घडवली पाहिजे” असे नमूद केले.
सदर प्रसंगी उपकर्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, सचिव श्रीधर जाधव, तुकाराम घाडगे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, महेंद्र पवार, सुभाष जाधव, समाजसेवक पांडुरंग साळवी, मंगेश पवार, तुळशीराम शिर्के, आनंद खांबे, मध्यवर्ती महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवडी, माहीम, चेंबूर, गोवंडी, कामोठे तसेच इतर विविध ठिकाणांहून आलेले उपासक, उपासिका यांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे तसेच उपस्थितांचे आभार मानून मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते यांनी कार्यक्रमाची सांगता केली.











