…ज्याच्या हाती सत्तेची काठी आमची चाकरी त्यासाठी! अशी नवी गणिते राज्यात जुळत असल्याने सर्वत्र चर्चेत असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा ‘बिनविरोध’चा पायंडा सुरूच आहे. नगरपालिकांमध्ये एरव्ही काही तुरळक प्रभागांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याची उदाहरणे होती. यंदा मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव अशा विविध महापालिकांमध्ये महायुतीचे ६० हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महापालिका निवडणुकीत नवीनच पायंडा पडला. विशेष म्हणजे विविध पालिकांमध्ये सत्ताधारी (बिन आवाजाच्या काठीमुळे) महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून आले आहेत.






उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून काही शहरांमध्ये वादावादी, आरोप-प्रत्यारोप झाले. अर्ज मागे घ्यावा म्हणून धमकविल्याचे आरोपही विरोधी नेत्यांनी केले आहेत. काही महापालिकांमध्ये परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले. सत्ताधारी महायुतीला मदत होईल, अशीच शासकीय यंत्रणांनी भूमिका घेतल्याचा, तसेच अर्ज मागे घेण्यासाठी धाकदपटशा करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघात भाजपचे १५ उमेदवार निवडून आले, तर शिवसेना शिंदे गटाचे सहा जण असे एकूण २१ जण बिनविरोध निवडून आले आहेत. पुण्यात दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन असे भाजपचे चार जण बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील चार महापालिकांमध्ये १७ जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात भाजपचे १०, शिवसेना शिंदे गटाचे सहा तर मालेगावमध्ये स्थानिक ‘इस्लामिक पार्टी’चा एक जण बिनविरोध निवडून आला आहे.
अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन जण बिनविरोध निवडून आले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील महापालिकांमध्ये कोणत्याच प्रभागात निवडणूक बिनविरोध झालेली नाही.
भाजपचे ४४ बिनविरोध
– कल्याण-डोंबिवली १५, पनवेल ६, भिवंडी-निजामपूर ६, जळगाव ६, पुणे २, पिंपरी-चिंचवड २, धुळे ४, अहिल्यानगर ३
शिंदे गटाचे १९ जण बिनविरोध
– ठाणे ७, कल्याण-डोंबिवली व जळगावमध्ये प्रत्येकी सहा असे १९ उमेदवार
निवडणूक बिनविरोध कशी?
– विरोधी उमेदवारांनी माघार घेतली किंवा अर्ज बाद झाला तर निवडणूक बिनविरोध होते. अनेकदा विरोधी उमेदवारांना पैशांचे आमिष दाखवून निवडणूक बिनविरोध केली जाते. काही वेळा धमकावून किंवा धाकदपटशा करून समोरच्या उमेदवारांना मागे घेण्यास भाग पाडले जाते.
– महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने पोलीस तसेच सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपच्या उमेदवारांकडून धमकविण्यात आल्याचा आरोप विरोधी उमेदवारांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्षांवरच गंभीर आरोप
उमेदवारी अर्जावरून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी विरोधी उमेदवारांना धमकावल्याचा तसेच विरोधी उमेदवारांचा अर्ज स्वीकारू नये म्हणून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कारवाईची मागणीही ‘आप’ने केली आहे. विधानसभा अध्यक्षांवर एवढे गंभीर स्वरुपाचे आरोप होण्याची राज्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी विरोधी नेत्यांना पालिका कार्यालयात धमकविल्याची चित्रफीत समोर आली आहे.
आतापर्यंत महापौर निवडणुकीत घोडेबाजार होतो, असे ऐकायला मिळायचे. यंदा महापालिका निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार बघायला मिळाला. पराभवाच्या भीतीनेच महायुतीच्या उमेदवारांनी विरोधी उमेदवारांवर दबाव आणून अर्ज बाद केले किंवा माघार घेण्यास भाग पाडली. विधानसभा अध्यक्षांचे वर्तनही राज्याने अनुभवले असल्याचा आरोप विरोधकांच्या वतीने करण्यात आला आहे.











