सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-पुणे व सोलापूर-विजयपूर या महामार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. तिन्ही महामार्गांवरील लांबोटी, वडकबाळ, तिऱ्हे येथील पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा पाण्याचा प्रवाह पाहून या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते, तुर्तास येथून वाहनांना पुढे सोडले जात नाही. रेल्वेची मात्र एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.






सद्यस्थिती नक्की वाचा…
१) वडकबाळ पूल : सोलापूर-विजयपूर महामार्गावरील वडकबाळ पूल सध्या पाण्यामुळे बंद करण्यात आला आहे. तो अजूनही बंद असून रात्री उशिरापर्यंत तो सुरू होणार नाही, अशी माहिती तहसीलदार सुजित नरहरे यांनी दिली.
२) तिऱ्हे पूल : सोलापूर- कोल्हापूर या महामार्गावरील तिऱ्हे येथील पूल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. सीनेचे पाणी पुलाला टेकल्याने सावधगिरी म्हणून पूल अजूनही बंदच असल्याची माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली.
३) लांबोटी पूल : सोलापूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील पूल सध्या पाण्यामुळे बंद आहे. मंगळवारी रात्री साडेअकरापासून हा पूल बंद केला आहे. पुलाला पाणी टेकले असून चार-पाच तासांनी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर ‘एनएचआय’चे अधिकारी पहाणी करतील. त्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात रात्री उशिरा निर्णय होईल, अशी माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.
४) रिधोरे-वडशिंगे पूल : रिधोरे येथील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सध्या रिधोरे येथील पुलावरून हलकी वाहने सोडली जात आहेत, अशी माहिती तहसीलदार संजय भोसले यांनी दिली.पाण्याचा विसर्ग झाला कमी, पण…
सध्या खासापूर व चांदणी या धरणातून १५ हजार क्युसेक, सीना- कोळेगाव धरणातून ६५ हजार आणि भोगावती नदीतून २२ हजारापर्यंत विसर्ग सुरू आहे. दोन लाख क्युसेकचा विसर्ग आता निम्म्याने कमी झाला आहे. त्यामुळे नद्या काठांवरील गावांमध्ये पसरलेले पाणी रात्री उशिरा कमी होईल. याशिवाय पाण्यामुळे बंद करण्यात आलेले मार्ग देखील रात्री उशिरापासून सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळेल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर पुणे रेल्वे एका लेनने सुरू
सीना नदीला महापूर आल्याने काही महामार्गांवरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे बुधवारी पहाटे चार ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत रेल्वेची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता पुण्याकडे जाणारी एक लेन सुरू करण्यात आली असून मुंबईकडून सोलापूरकडे येणाऱ्या काही गाड्या या लेनवरून आणल्या जात आहेत. काही गाड्या कुर्डुवाडी-लातूर-कलबुर्गी तर काही गाड्या मिरजमार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.











