स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दिलजमाईनंतर ‘मिले सुर मेरा तुम्हारा…. या भूमिकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आता मात्र ‘हम भी किसीसे कम नही…’ या भूमिकेत आले असून पुणे जिल्ह्यात याची प्रचिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जाणवू लागली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर एकत्र आलेले राष्ट्रवादी आता स्वतंत्र मार्ग अवलंबत असून आगामी निवडणूक यांचा विचार करता आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या हेतूने जिल्ह्यामध्ये रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांच्या मदतीला मित्रपक्ष असलेल्या पक्षांनी ही साथ दिल्याने या निवडणुकीमध्ये जोरदार रंगत निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल २१४ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १८ जागांसाठी ५२ उमेदवार अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे.






अर्ज छाननीनंतर २६६ अर्ज वैध ठरले होते, मात्र अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला आणि मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या महायुतीने एकत्र येत अधिकृत पॅनल जाहीर केले आहे. महायुतीच्या पॅनल घोषणेवेळी आमदार माऊली कटके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महायुतीच्या पॅनलमध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून प्रमोद पन्हाळ, संतोष शिंदे, शशिकांत दसगुडे, स्वप्निल गायकवाड, विजय ढमढेरे, राहुल गव्हाणे व बापूसाहेब शिंदे यांचा समावेश आहे. तर ओबीसी गटातून राजेश लांडे, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून सुहास मलगुंडे, आणि महिला राखीव गटातून प्रतिभा नागवडे व सुजाता नरवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गटातून सागर दरेकर व संतोष मोरे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून संभाजी करडिले, आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून वैष्णव इसवे यांना महायुतीने मैदानात उतरवले आहे.
विरोधकांकडुन मातब्बर रिंगणात
महायुतीला तगडे आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. माजी आमदार अशोक पवार यांनी पक्षाच्या वतीने माघारीच्या दुसऱ्याच दिवशी पॅनल स्थापन करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट आणि अटीतटीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
शरदचंद्र पवार गटाकडून सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून संतोष बाळासाहेब भोसले, विश्वास रामकृष्ण ढमढेरे, राजेंद्र रंगनाथ गायकवाड, संभाजी शिवाजी फराटे, उत्तम माणिकराव शेलार, ज्ञानेश्वर बबनराव थेरकर आणि शिवाजी सुखदेव वडुले हे निवडणूक लढत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघासाठी नामदेव महादेव जाधव, तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघासाठी बाळासाहेब दादाभाऊ जाधव हे रिंगणात आहेत.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून नानासाहेब अनंथा साबळे, तर सहकारी संस्था विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून सतीश भाऊजी कोळपे निवडणूक लढवत आहेत. याशिवाय सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गटातून विकास काशिनाथ शिवले, आणि महिला राखीव मतदारसंघातून शशिकला नानाभाऊ फुलसुंदर व राजश्री रवींद्र फराटे हे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असून इतर काही उमेदवार वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
मतदारांची आकडेवारी
या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी १ हजार ५८९ मतदार, ग्रामपंचायत मतदारसंघाच्या ४ जागांसाठी २०६ मतदार, व्यापारी-आडते मतदारसंघाच्या २ जागांसाठी ४६४ मतदार आणि हमाल-मापाडी मतदारसंघाच्या १ जागेसाठी १३७ मतदार मतदान करणार आहेत.
एकूण २ हजार ३९६ मतदार या १८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरवणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातच अनेक अपक्षांनीही मैदानात उडी घेतल्याने अपक्षांची मोठी मांदियाळी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.













