जसप्रीत बुमराह ठरत आहे टीम इंडियासाठी डोकेदुखी? इरफान पठानने उपस्थित केले गंभीर प्रश्न!

0

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाला लॉर्ड्स येथे २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर भारत पुन्हा मालिकेत पिछाडीवर गेला असून इंग्लंड २-१ अशा आघाडीवर आहे. यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या गुणतालिकेत भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे, तर इंग्लंड तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

या पराभवानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि सध्याचा समालोचक इरफान पठान याने टीम इंडियाच्या प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या कामगिरीवर आणि वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

इरफान पठानने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पाचव्या दिवशी सलग 9.2 ओव्हर्सचा स्पेल टाकतो, फलंदाजी करतो आणि क्षेत्ररक्षण करताना ऋषभ पंतसारख्या खेळाडूला रनआउट करतो, पण त्याच्या वर्कलोडबाबत कोणीच बोलत नाही.

अधिक वाचा  IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं Tata Sierra कारसह ५ पुरस्कार जिंकले मूर्ती लहान, कीर्ती महान! 

“बेन स्टोक्सच्या गेल्या वर्षी अनेक सर्जरी झाल्या तरीही तो सातत्याने गोलंदाजी करत आहे. मग बुमराहसारख्या गोलंदाजांचा वापर इतका मर्यादित का केला जातो?”, असा सवाल पठानने उपस्थित केला.

इरफान पठान म्हणाला, “बुमराह केवळ पाच ओव्हर्स टाकतो आणि जो रूट फलंदाजीला येईपर्यंत थांबतो, हे अयोग्य आहे. आपण सामना जिंकण्यासाठी खेळत असतो, तेव्हा वर्कलोड नव्हे, तर सामना जिंकणे हेच प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे.” लॉर्ड्स टेस्टमध्ये बुमराहने ७ विकेट्स घेतल्या असल्या, तरी त्याचा मर्यादित वापर टीम इंडियाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करतो.

पठानने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या कामगिरीचं विशेष कौतुक करताना सांगितले की, “आर्चर जवळपास चार वर्षांनंतर कसोटी सामना खेळत होता, तरीही त्याने ४० ओव्हर्स टाकल्या आणि ५ विकेट्स घेतल्या.” अशा वेळी बुमराहसारख्या प्रमुख गोलंदाजाकडून जास्त अपेक्षा असणं स्वाभाविक आहे, असंही तो म्हणाला.

अधिक वाचा  विधान परिषद निवडणुक मतपत्रिकेवर होणार, हा आकडा न लिहिल्यास मत अवैध ठरणार

इरफान पठानने बेन स्टोक्सच्या नेतृत्वशैलीचं कौतुक करताना म्हटलं की, “त्याने कठीण परिस्थितीत हिट-द-डेक गोलंदाजी करत सामना इंग्लंडच्या बाजूने वळवला. जर स्टोक्स ९ ओव्हर्स सलग टाकू शकतो, तर भारतीय खेळाडूंना मागे का राहावं लागते?”