पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली

0

पुण्यात एका तरुणाची कोयत्याने वार करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कात्रज परिसरात ही घटना घडली असून, परिसरात खळबळ उडाली. मयत तरुण पान खाण्यासाठी पानटपरीवर गेला होता. तिथेच वाद झाला आणि एकाने थेट कोयताच त्याच्या डोक्यात मारला. कात्रज भागातील साई सिद्धी चौकात असलेल्या एका पानटपरीजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी एका अटक केली आहे.

कोयत्याने हत्या करण्यापूर्वी काय घडलं?

ज्याची हत्या करण्यात आली, त्या तरुणाचे नाव आर्यन साळवे आहे. आर्यन हा मूळचा नाशिकमधील आहे.

आर्यन साळवे हा त्याच्या मामाकडे धनकवडीमधील आंबेगाव पठार येथे राहण्यासाठी आलेला होता. शुक्रवारी (११ जुलै) रात्री तो साई सिद्धी चौकात गेला होता.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

चौकातील एका पानटपरीवर तो पान खाण्यासाठी गेला. त्याच वेळी आर्यनचा धैर्यशील मोरे यांच्याशी वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोरेने थेट कोयताच काढला.

आर्यनची बोटं तुटली, नंतर डोक्यात केला वार

धैर्यशील मोरेने रागात कोयत्याने आर्यन साळवेवर सपासप वार केले. कोयत्याचा वार आर्यनने हाताने अडवण्याचा प्रयत्न केला. कोयत्याचा वार हातावर झाला आणि त्याची बोटं तुटली. त्यानंतर मोरेने कोयता त्याच्या डोक्यात मारला. त्यात आर्यन गंभीर जखमी झाला.

कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नंतर आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिक वाचा  राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची एकाच दिवशी निवड! ‘हा’ असेल मुहूर्त

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली आहे.