श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांचं नातं संपूर्ण परिसराला परिचित असल्याने आजतागायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील लोकांनी त्यांच्या शब्दाला मान दिला. मुळशी तालुक्यात एका विशिष्ट स्तरावर अन् अभिमानास्पद ‘पूर्णत्वाची कडी‘लागलेल्या या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे बदलत्या समीकरणामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात वाकड येथे हवेली खेड मुळशी येथील सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली; परंतु संपूर्ण पुणे जिल्ह्यात लक्ष लागलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात याच कारखान्याच्या बांधणीच्या जोरावर जे अयशस्वी बंड उभारण्यात आल्याने संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मावळ भागातून या निवडणुकीची ‘दादाकृपे’ने जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून व्यक्तिगत गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मावळ वगळता सर्व लोकप्रतिनिधींची प्राथमिक बैठक वाकड येथे पार पडल्यानंतर सर्वांनी सहमतीने आज (शनिवार, दि. २२) वाकड येथील श्री संत तुकाराम मंगल कार्यालयात सर्व उमेदवारांची बैठक होणार आहे.






संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाल्यापासून संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या माध्यमातून कायमच या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र घेत 70 /30 फॉर्म्युलानुसार उमेदवारांची निवड केली जाते त्यामुळेच आजपर्यंत सर्व सभासद आणि सर्वपक्षीय नेत्यांनी नानासाहेब नवले यांना पसंती देण्याचे काम केले आहे. मुळशी हवेली खेड मावळ शिरूर या पाच तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असतानाही केवळ याच भूमिकेमुळे सर्वांनी आज तागायत संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या विचारांना पाठिंबा दिला त्याच पाठिंब्यावर कारखान्याने संलग्न सर्व प्रकल्प पूर्ण करून आज ‘पूर्णत्वाची कडी’ लावली असली तरी सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून विभिन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मावळ भागात गाजलेली मावळ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यामुळे यंदा या सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक केले सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचे एकत्र सदस्य असतानाही विकास मंच च्या नावाने जी बंडखोरी झाली त्यास संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची रसद कारणीभूत असल्याची चर्चा झाल्याने मावळ विधानसभाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत तोडीस तोड लढत होण्याची संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याच भागाचे प्रतिनिधित्व करणारे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांची मात्र बिनविरोध करण्याची ‘मनीषा’आहे याची जाणीवपूर्व बैठकीमध्ये स्पष्टपणे दिसली.
‘संत तुकाराम’साठी सर्वपक्षीय योगदान
शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहकायनि आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारखान्याच्या उभारणीसाठी नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी खासदार गिरीश बापट, माजी आमदार रूपलेखा ढोरे, आमदार शंकर मांडेकर, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, माजी आमदार सुरेश गोरे या सर्व नेत्यांनी योगदान दिले असल्याचा उल्लेखही खासदार बारणे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांचे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून कारखान्याच्या यशस्वी वाटचालीस सहकार्य झाले आहे.
नवनवीन प्रकल्पांमुळे कारखान्याची प्रगती
कारखान्याने वीजनिर्मिती आणि इथेनॉल प्रकल्पाची उभारणी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, खत, बी-बियाणे यांचा पुरवठा, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लागवडीसाठी प्रोत्साहन यासाठी नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने मोलाची भूमिका आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही सर्वपक्षीय सहमतीने आणि एकमताने पार पडावी, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली व खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीस माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी आमदार अशोक मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार बाबाजी काळे आदी उपस्थित होते. या बैठकीत कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकमताने निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे स्पष्ट केले.











