राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून वाद सुरू असून त्याची कबर हटविण्याची मागणी शिवभक्तांकडून होत आहे. तर या मुद्द्यावर महायुती सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास कबर उखडून टाकू असा इशाराही देण्यात आला आहे.तर राज्यात औरंगजेबची कबर काढून टाकावी की नको यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडलीय. शिंदे यांनी आपली भूमिका मांडताना, ‘औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? जी शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे’, असे म्हटलं आहे.






देहू येथील श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी, छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबची कबर हटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या मागणी आणि वादावर आपली भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे यांनी, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? असा सवाल करताना जी भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आपण शिवभक्तांच्या भावनांचा आदर करत असून औरंगजेबने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराजांचे शौर्य आणि औरंगजेबचे क्रौर्य आहे. त्याच्या क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अशा औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे? त्यामुळेच शिवभक्तांची भावना ही औरंगजेबची कबर काढून टाकावी, ती आपल्या महाराष्ट्रात नको अशी आहे. हीच माझीही भावना असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
तसेच राज्यातील जनतेला उद्देशून जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबचे उदात्तीकरण करू नये, असे आवाहान केले आहे. तर क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. औरंग्या महाराष्ट्राचा दुश्मन होता, तो देशद्रोही, आणि राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात नकोच. तर जे औरंग्याचे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
जनाची नाही तर मनाची तरी
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाची उपमा दिल्यावरून देखील त्यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस म्हणजे औरंगजेबी वृत्ती असून ते त्यांच्या कृत्यातून दिसते. काँग्रेसवाल्यांनी आधी संभाजी महाराज यांचा चित्रपट बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा, असा टोलाही शिंदेंनी लगावला आहे. तसेच औरंग्याची क्रूरता बघा, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते आता ते मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे.
आम्ही जो काही कारभार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच. आम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जो आदर्श होता, त्याच आदर्शावर आम्हीही काम करत आहोत. त्यामुळे कोणाशी तुलना तुम्ही करता? जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा, अशी टीका देखील सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.











