…तर ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा भेटलीच नसती! असं का म्हणाला Prithviraj Mohol? निकालावरून गालबोट लागलं अन्…

0

उपांत्य फेरीच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालावरून गालबोट लागले.अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने मानाची गदा पटकावली.मात्र, तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पृथ्वीराज यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालावरून गालबोट लागले. तसेच अंतिम सामन्यातही प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड याने शेवटच्या क्षणी मैदान सोडले. या पार्श्‍वभूमीवर पृथ्वीराज याच्याशी त्याच्या कुस्ती कारकिर्दीबाबत, ‘महाराष्ट्र केसरी’तील वादाबाबत आणि पुढील वाटचालीबाबत साधलेला संवाद…

प्रश्‍न : राजकीय दबावातून कुस्ती खेळली गेली, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तेथे उपस्थित होते, असे आक्षेप घेतले गेले. काका पवार यांनीही टीका केली की, ‘या पुढचा महाराष्ट्र केसरी राजकीय व्यक्तीच ठरवतील…’?

पृथ्वीराज मोहोळ : असे काही नाही. मी माझे कुस्तीतील योगदान दिलेले आहे. ते पाहायला संपूर्ण महाराष्ट्र होता. तेथे पंचांनी शिट्टी मारल्यानंतर मी कुस्ती पूर्ण केली आणि पुढच्या कुस्तीसाठी निघून गेलो. तसेच, सगळ्यांना माहिती आहे की, कोथरूडमधील अधिवेशन मुरलीधर मोहोळ यांनीच घेतले होते. तेथे मी कुस्ती हरलेलो आहे. नाहीतर मी त्याच ठिकाणी ‘महाराष्ट्र केसरी’ झालो असतो. आरोप करणाऱ्यांनाही माहिती आहे की, असा काही पक्षपातीपणा नसतो. सगळ्यात कमी वयात मी महाराष्ट्र केसरी झालेलो आहे, त्यामुळे हे सुरू असेल.

प्रश्‍न : तुझाही यापूर्वी पराभव झालेला आहे. त्या निकालाबाबत तुझेही आक्षेप होते. मात्र तुझा प्रतिस्पर्धी असलेल्या शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचाला लाथ मारली. याकडे तू कसे पाहतो?

– खिलाडूवृत्तीनुसार ते चुकीचे आहे. कुस्ती क्षेत्रात हे निषेधाचे आहे. असे कधीच होऊ नये. तसेच घरातले माझ्यासोबत असल्यामुळे मला पराभव झाल्याचे त्यावेळी वाटलेच नाही. मी एका चांगल्या पहिलवानाकडून हरलो होतो आणि तेही चांगली कुस्ती करून हरलो होतो. मला घरातल्यांनी सांगितले, की ‘आपण कुठेच कमी नाही. आपण मेहनत केली तर ते आपल्याला भेटू शकते.’ त्यानुसार वर्षभर सराव केला. दिल्लीत महाबली सतपाल यांच्याकडे छत्रसाल मैदानात तयारी केली. त्याचे फळ मला आता मिळाले आहे.

अधिक वाचा  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा ओबीसी आरक्षणासाठी आणि भारतीय स्त्रियांच्या न्यायहक्कासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला – डॉ. आशिष तांबे

प्रश्‍न : विजय मिळविल्यानंतर निकालाच्या आक्षेपाबाबत चर्चा होत आहे, याचे वाईट वाटते का?

– वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. निर्णय चुकीचा असता तर गदा भेटलीच नसती. एक पहिलवान मैदान सोडून गेला. दुसऱ्या कुस्तीत मी माझे काम केले. पंचांनी त्यांचे काम आहे. पंचांनी शिट्टी वाजविल्यामुळे मी पोझिशन सोडली. त्यांनी शिट्टी नसती वाजवली तर कुस्ती माझ्याच बाजूने झाली असती. लॉट्स काढताना पक्षपातीपणा होतो, असे म्हणतात. पण सर्व पहिलवानांना माहिती आहे की, असे काही नसते. वजनापासून पहिलवानांवर कॅमेरा असतो. त्यानुसार टोकन निघते. आता जे टीका करत आहेत, त्यातील एकही टीका मी ‘महाराष्ट्र केसरी’ झाल्याची नाही. कारण, मी माझे काम केलेले आहे. त्यांचा आक्षेप पंचांबद्दल आहे. ते त्यांच्याबद्दल बोलत आहेत.

प्रश्न : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मात्र शिवराज यांची बाजू घेतली आहे. त्यांनी तर थेट पंचाला गोळी घातली पाहिजे होती, असे म्हणाले आहेत?

– पण ते असेही म्हणालेत की, पृथ्वीराज त्याचे काम करून महाराष्ट्र केसरी झालेला आहे. त्यांचा आक्षेप फक्त त्या पंचांवर आहे.

प्रश्‍न : एक चर्चा अशीही आहे की, तुमच्यातील हा सामना पुन्हा झाला पाहिजे. त्यासाठी तू तयार आहेस का?

पृथ्वीराज मोहोळ- नक्कीच माझी तयारी आहे. कधीपण आणि कोठे पण घ्या. मातीवर घ्या किंवा मॅटवर घ्या…

प्रश्‍न : कुस्ती आणि वाद हे गणित झाले आहे. त्यामुळे नियमात काही बदल झाले पाहिजेत, असे वाटते का?

– माझ्यावरही अन्याय झाला. पण मी कधी कोणाला बोललो नाही. सात सेकंदांत पंच पॉइंट देईल, असा नियम नाही. मात्र, माझ्याविरोधात तो दिला होता. तरीही आपण कोणाला काही बोललो नाही. फक्त आक्षेप दाखवून चर्चा केली.

अधिक वाचा  शरद पवार यांची पहिल्यांदाच ही खंत? दोन दिवसानंतर रुग्णालयातून पहिली पोस्ट, …विविध पर्यायांचा तपास परंतु पर्यायच उपलब्ध नाही!

प्रश्‍न : दोन संघटनांमुळे खेळाचे आणि खेळाडूंचे नुकसान होत आहे का?

तसे पाहिल्यास खेळाडूंचे नुकसान होत आहे आणि नाही पण. आता दुसरी पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. त्यातही भरपूर बक्षिसे आहेत. येथे पण भरपूर बक्षिसे आहेत.

प्रश्‍न : पंचांच्या कामगिरीबीबत काय वाटते?

– पंचांच्या समितीने फेडरेनशच्या नियमांची माहिती पहिलवानांना दिली पाहिजे. कारण, बऱ्याच वेळा ते म्हणातत की, आमचा नियम हा आहे. पण तो पहिलवानांना कळला पहिजे. पहिलवानांना बसवून सांगितले पाहिजे की, असा असा नियम आहे. नियम बदलत असतात. ते पहिलवानांपर्यंत पोहोचले पाहिजेत व सांगितले पाहिजेत.

प्रश्‍न : महाराष्ट्र केसरी मिळविल्यानंतर तू म्हणालास की ही माझी सुरुवात आहे. तुझे ध्येय काय आहे?

– महाराष्ट्रातील प्रत्येक पहिलवानाचे ‘महाराष्ट्र केसरी’चे स्वप्न असते. जेवढे ‘महाराष्ट्र केसरी’ झाले आहेत, त्यात सर्वांत कमी वय माझे आहे. ही फक्त सुरुवात आहे. आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहे. दिल्लीत महाबली सत्पाल यांच्या तालमीत पाच ऑलिंपिक पदक विजेते घडलेले आहेत. तेथे आम्हाला मार्गदर्शन मिळते. त्या तालमीत तयारी करत असल्याने ऑलिंपिक पदक मिळवायचे आहे. स्वतः महाबली सत्पाल यांचे महाराष्ट्रातील मुलांकडे लक्ष असते. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक मल्ल होते. त्यांची इच्छा होती की, त्यांच्याकडील मल्लाने महाराष्ट्र केसरी व्हावे. असे आतापर्यंत झाले नव्हते. त्यांची इच्छा मी पूर्ण केली. त्यांनी तसे बोलून दाखवले.

प्रश्‍न : महाराष्ट्रातील मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे कमी पडतात?

– महाराष्ट्रातील मल्ल मातीतील असतात. गरिबीमुळे आपले मॅट कुस्तीकडे थोडे दुर्लक्ष होते. दिल्ली व हरियानातील मल्ल मॅटवरील सराव कधीच सोडत नाहीत. आपल्याकडे मैदानी कुस्तीला मोठेपणा आहे. तेथे कुस्ती करून गरिबाचा पहिलवान त्याचा खुराकाच खर्च भागवत असतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात असते की आपल्याला महाराष्ट्रातील मोठ्यातल्या मोठ्या कुस्त्या करायच्या आहेत. त्यामुळे त्याचे स्वप्न पुढे जात नाही. त्यामुळे मॅटवरील कुस्तीकडे लक्ष दिले पिहाजे.

अधिक वाचा  भारत जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश बनला; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, ‘या’ शहरात सर्वाधिक श्रीमंत

प्रश्‍न : तुझा कुस्तीतील आवडता डाव कोणता?

– सर्वांनी पाहिले असेल की ‘महाराष्ट्र केसरी’च्या उपांत्य लढतीत शिवराज राक्षे याच्यावर टाकलेला ढाक डाव हा माझा आवडता आहे. कुस्ती हा टेक्निकचा खेळ आहे. सर्व म्हणतात की पहिलवानाकडे टेक्निक नसते. पण कुस्ती एवढे टेक्निक कुढेच नाही. माझ्या घरातूनच हा डाव शिकवण्यात आला आहे. आमच्या घराण्यात चालत आलेला तो डाव आहे. आमच्या घरात जेवढे पहिलवान आहेत, ते हाच डाव करायचे.

प्रश्‍न : घरातल्यांनी कशाप्रकारे मार्गदर्शन केले.

– चुलत आजोबा अमृता मोहोळ १९८९ मध्ये वर्धा येथे झालेल्या ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम लढतीत विजयी झाले होते. मात्र त्या वेळी झालेल्या वादामुळे त्या लढतीचा निकाल अनिर्णित ठेवण्यात आला. तेव्हापासून मोहोळ कुटुंबाला ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची आस होती. आजोबा विठ्ठल मोहोळ हे वयाच्या ८०व्या वर्षी पण माझी तयारी करून घेत होते. तसा खुराक ते खाऊ घात होते. वडील राजेंद्र, चुलते सचिन व सागर यांनी प्रयत्न केले. कुस्तीतील सर्व धडे वडिलांकडूनच मिळाले. चुलत्यांनी मार्गदर्शन केले. आपण बाहेर कुस्तीसाठी जाताना काय करावे.

महाराष्ट्र केसरीसाठी वर्षभर काय तयारी करावी, याचे मार्गदर्शन केले. त्यामुळे बाहेर जाऊन प्रशिक्षण घेण्याची गरजच पडली नाही. खालकर तालमीत आंग्रे वस्ताद आमच्या आजोबांपासून आहेत. मला लंगोट लावण्यापासून त्यांनी तयारी करून घेतली. ते म्हणाले, की तीन पठ्ठे होते. चौथ्याने केले. त्याचे सार्थक झाले. घरात सर्व मोठे पहिलवान असल्यामुळे त्यांनी मला मार्गदर्शन केले. मागच्या वर्षी मी फुलगाव आणि धाराशिव येथे हरलो होतो. त्यानंतर दोनच दिवसांनी मी दिल्लीला गेलो होतो. मला माहिती होते की मी हरलेलो आहे. त्यामुळे मी दुसऱ्या दिवसीपासूनच तयारी सुरू केली. साडेतीनला उठून तयारी सुरू व्हायची. त्याचेच हे फळ आहे.