भारतातील श्रीमंतांची संख्या वेगाने वाढत असून, अल्ट्रा-रिच लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आर्थिक विकास, तंत्रज्ञान क्षेत्र आणि गुंतवणुकीच्या वाढत्या संधींमुळे देशातील संपत्तीत सातत्यानं भर पडत आहे.






अल्ट्रा-रिच व्यक्तींची (UHNWI) आकडेवारी
नाईट फ्रँकच्या (Knight Frank) अहवालानुसार, २०२६ मध्ये भारतात १९,८७७ व्यक्ती अशा आहेत ज्यांची मालमत्ता ३० दशलक्ष डॉलर (सुमारे २५० कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. ही संख्या जागतिक UHNWI लोकसंख्येच्या २.८ टक्के आहे. गेल्या ५ वर्षांत हा आकडा २ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांपर्यंत वाढलाय. २०३१ पर्यंत भारतात UHNWI ची संख्या २७ टक्क्यांनी वाढून २५,२१७ होऊ शकते. UHNWI म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्याकडे ३० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त संपत्ती आहे.
जागतिक स्तरावरही श्रीमंतांची संख्या वाढली असून २०२१ मधील ५.५ लाखांवरून २०२६ मध्ये ती ७.१ लाखांवर पोहोचली आहे, म्हणजेच दररोज सुमारे ८९ नवीन अल्ट्रा-रिच लोक जोडले गेलेत.
भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहणारी शहरे
भारतात मुंबईमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोक राहतात. शहरांनुसार श्रीमंतांची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:
मुंबई: ३५.४ टक्के (पूर्वी ही ४१.३ टक्के होती).
दिल्ली: २२.८ टक्के (यात वाढ झाली आहे).
बंगळुरू: १०.६ टक्के.
हैदराबाद: ६.३ टक्के.
चेन्नई: ४.८ टक्के.
अल्ट्रा-रिच लोकसंख्या असलेले जगातील आघाडीचे देश
अल्ट्रा-रिच लोकसंख्येच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून भारत सहाव्या क्रमांकावर आहे:
अमेरिका: २५१,३५७
चीन: १२१,६७७
जर्मनी: ३८,२१५
यूके: २७,८७६
फ्रान्स: २१,५१८
भारत: १९,८७७
जपान: १८,९१४
भारतातील अब्जाधीशांची संख्या
UHNWI सोबतच भारतात अब्जाधीशांची संख्याही वेगाने वाढत आहे. २०२६ मध्ये हा आकडा २०७ अब्जाधीशांवर पोहोचला असून गेल्या ५ वर्षांत यात ५८ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०३१ पर्यंत ही संख्या ५१ टक्क्यांनी वाढून ३१३ होण्याची शक्यता आहे.












