मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात मुख्य संशयीत आरोपी वाल्मिकी कराड याला अटक झाली असली तरी तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. काही दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. सगळ्या आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री शब्दाला खरे उतरले नाही तर मराठे रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.






मनोज जरांगे म्हणाले, मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आले होते. या प्रकरणातील आरोपीला अजून अटक झालेली नाही याबाबत त्यांनी चर्चा केली. आमच्या सर्वांची इच्छा आहे, सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरु झाले आहेत.
अन्यथा मराठे रस्त्यावर
मनोज जरांगे या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याच्या आरोपाबाबत म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे लवकरच सिद्ध होईल. आता चौकशी सुरु झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. त्यांचे सीडीआर घेतले जातील. कॉल डिटेल्सवरुन सगळे समोर येईल. कोणी खंडणी मागितली, कोणी मागायला लावली, कोणी फोन करायला लावले, आरोपी कोणी फारर केले, आरोपींना सांभाळत कोण हे सगळे चौकशीतून पुढे येईल. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लागणार आहे. 302 चा गुन्हा लावला जाऊ शकतो. सरकारने हे केले नाही तर मराठे पुन्हा रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
मुख्यमंत्री शब्द पाळतील
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक न होणे हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे की नाही हे याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते म्हणाले, राजकरणात, समाजकारणात काम करताना कोणी कोणाचे लाडके नसते, शत्रू नसतो, विरोधक नसतो. ज्या ज्या वेळेस चुका होतील त्या त्या वेळेस बोलावे लागेल. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का त्या बद्दल मला माहीत नाही. मला एवढेच माहीत आहे की या प्रकरणात जे जे येतील मग मंत्री असो की आमदार असो की आणखी कोणी असो कोणालाही सोडायचे नाही. अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंद पाडणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले. ते म्हणाले, आरोपींनी कोणा-कोणाला फोन केले. आरोपींना कोणी पळवून लावले. कोणी आसरा दिला, हे सर्व बाहेर येणार आहे.











