हिवरे बाजार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात वसलेले गाव आहे. येथे राहणाऱ्या लक्षाधीशांची संख्या जास्त असल्यामुळे हे गाव भारतातील सर्वांत श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. वास्तविक गावात ३०५ कुटुंबे राहतात, त्यापैकी ८० कुटुंबे करोडपती आहेत. त्याव्यतिरिक्त ५० कुटुंबे वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात. गावाची एकूण लोकसंख्या १२५० पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती आहे. ८० आणि ९० च्या दशकात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे गावात एकेकाळी गावकऱ्यांवर गरिबीची परिस्थिती ओढवली होती आणि त्यामुळे गावकऱ्यांना अन्न आणि नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करावे लागले होते. १९९० मध्ये ‘या’ गावाची परिस्थिती इतकी वाईट होती की, तेथील ९०% कुटुंबे गरीब होती.
मात्र, हिवरे बाजारातील लोकांनी एकत्र येऊन, १९९० मध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती नावाची समिती स्थापना केली. या समितीच्या अंतर्गत त्यांनी श्रमदानातून गावात विहिरी खोदून वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. त्यांनी गावात जास्त पाणी लागणार्या पिकांच्या पेरणी करण्यावरही बंदी घातली. त्यांच्या मेहनत आणि एकजुटीचे फळ म्हणजे आता गावात ३०० हून अधिक विहिरी आहेत. कूपनलिका पूर्ण झाल्याने भूजल पातळीही ३० फुटांवर आली आहे.
गावातील सर्व कुटुंबे केवळ शेतीतून उत्पन्न मिळवतात आणि भाजीपाला पिकवून दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवतात. हिवरे बाजार गावाचे दरडोई उत्पन्न हे देशातील टॉप १० टक्के ग्रामीण भागातील दरमहा ८९० रुपये सरासरी उत्पन्नाच्या दुप्पट आहे. हिवरे गावातील लोकांच्या एकजुटीमुळे गरिबी संपली असून, लोकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबले आहे. एवढेच नव्हे, तर गाव सोडून गेलेले लोकही आता परतले आहेत.
हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार हे देशातील अशा मोजक्या लोकांमध्ये गणले जातात, ज्यांनी आपल्या गावात सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांनी गावातील लोकांसाठी सात तत्त्वे ठरवून दिली आहेत. येथील पंचायतीचे नियम आणि रूपरेषा गावातील लोकांनी तयार केली आहे. हिवरे बाजार गावातील लोकही त्यांच्याकडून शिकून घेत, शेतीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याही उत्पन्नात वाढ होत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल २०२० रोजी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात हिवरे बाजार गावाचे कौतुक केले. त्यांनी पाण्याबाबत गावकऱ्यांच्या संवेदनशीलतेचे आणि पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी त्यांनी पीक पद्धती कशी बदलली याबद्दल कौतुक केले. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या पेरणीवर बंदी घातल्याबद्दल त्यांनी गावाला नावाजले.
लोक एकत्र येऊन परिस्थिती बदलू शकतात याचे हिवरे बाजार हे गाव एक उत्तम उदाहरण आहे. ग्रामस्थांनी मेहनत आणि एकजुटीने गावाचा चेहरामोहरा बदलून दाखविला आहे. त्यांची यशोगाथा अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांना काहीतरी चांगले करण्याची आणि स्वत:चे गाव स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रेरणा देते.