“पर्वती विधानसभा एकाच नावाचे तीन उमेदवार; मतदारांमध्ये गोंधळ वाढण्याची शक्यता!”

0

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारांचे २२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत त्यामध्ये अवैध असून २० नामनिर्देशन पत्र वैध स्वरूपात प्राप्त झाले आहेत अशी माहिती, पर्वती निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. आजपर्यंत आलेल्या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

पर्वती विधानसभा अंतर्गत दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार एकाच नावाने समोर आल्याचे नामनिर्देश अर्जातील यादीनुसार दिसून आले. एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत असताना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या नावाला साधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘ तुतारी ‘ चिन्हाचा ‘ पिपाणी ‘ या चिन्हाने अनेकांचा खेळ बिघडवला होता. तिन्ही उमेदवारांचे नाव आणि आडनावही एकच असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो. पर्वती विधानसभा मतदारसंघांत एक सारख्या वाटणाऱ्या नावांचा घोळ नेमका योगायोग की जाणून – बूजून आखलेला राजकीय डाव ? हे लवकर सिद्ध होईल.

अधिक वाचा  उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात टीकेत वाढ; तांत्रिक तपासणी अंतिम टप्प्यात प्राथमिक अहवाल या दिवशी?

याविषयी महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ” पर्वतीकरांनी पर्वती विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा ज्यांना संधी दिली अश्या लोकप्रतिनिधीला एक ही ठोस काम करता आले नाही. पंधरा वर्षातील त्यांच्या एकाही कामावर त्यांनाच विश्वास नसल्याने अशा नावात साम्य असलेल्या उमेदवारांना पुढे करण्याचा डाव रचला आहे. पंधरा वर्षात नागरिकांची कामे केली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती. अशा कृत्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. आपल्या पर्वती मतदारसंघातील जनता सुज्ञ आणि चाणक्ष असल्याने असला रडीचा डाव ते हाणून पडणार आणि मला न्याय देणार असा मला आत्मविश्वास आहे. कारण विधानसभेची ही निवडणूक मी लढवत नसून पर्वती मतदार संघातील जनता लढवत असल्याने परिवर्तन अटळ आहे. तरीही, निवडणूक आयोगाकडून मतदारांना सावधानतेने मतदान करण्याचा सल्ला देण्यात यावा अथवा वेगळा काही उपया करता येईल, जेणेकरून एकसारख्या नावामुळे कोणताही गोंधळ होणार नाही. याची काळजी घ्यावी. मतदारांनी मतदान करताना नीट लक्ष देऊन उमेदवाराचे पूर्ण नाव, पक्ष, व चिन्ह तपासून मतदान करावे, असे महाविकास आघाडीच्या अश्विनी नितीन कदम यांनी आवाहन केले आहे.

अधिक वाचा  कोथरूडमध्ये पौड रोड परिसरात एम एन जी एल गॅस ची गळती; स्थानिक नगरसेवकाची कार्यतत्पर योजना