महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे असे वाटत असतानाच विदर्भातील ६२ जागांपैकी ४५ जागांवर काँग्रेसने दावा केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्या (ता. १) पुन्हा महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करणार आहेत.






लोकसभा निवडणुकीत अमरावती, रामटेक या हक्काच्या जागा सोडल्याने विदर्भातील विधानसभेच्या जागा मिळाव्यात, असा आग्रह शिवसेना ठाकरे पक्षाने धरला आहे. तर वर्ध्याची जागा शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने जिंकल्याने त्यांनीही दहा ते बारा जागांवर दावा केला आहे.
दसऱ्यापूर्वी जागावाटप पूर्ण करण्याचे महविकास आघाडीने निश्चित केले आहे. महाविकास आघाडीतील जवळपास ८० टक्के जागांवरील तिढा सुटल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र असून मुंबई व परिसरातील मतदारसंघाच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने नमते न घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी विदर्भातील ६२ पैकी किमान ४५ जागा लढविण्याचा हट्ट धरला आहे. विदर्भातून काँग्रेसकडे ६२ जागांसाठी ४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत.
…तर निर्णय वरिष्ठ पातळीवर
शिवसेना ठाकरे पक्षाला विदर्भातून दुहेरी आकड्यातील जागांची अपेक्षा आहे तर, राष्ट्रवादीचीही १२ ते १५ जागांवर नजर आहे. मात्र, विदर्भात हमखास यश मिळण्याची खात्री असल्याने काँग्रेस नेत्यांची जागा सोडण्याची तयारी नाही. विशेषत:, २०१९ मध्ये शिवसेनेने लढविलेल्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे आणि त्या जागा सोडण्यास त्यांची तयारी नाही. मात्र, त्यातही या जागांचा तिढा न सुटल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता आहे.











