जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ५२ टक्के अर्थात १५.२४ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने जोर धरला आहे. मावळ, मुळशी, भोर, वेल्हे व जुन्नर या तालुक्यांमध्ये २२ पैकी सरासरी २० दिवस पाऊस झाला आहे. तर शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या पूर्वेकडील तालुक्यांमध्ये तुलनेने पावसाचे दिवस कमी आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १९२.६ मिलिमीटर पाऊस झाला असून २२ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ६३ टक्के पाऊस झाला आहे. वेल्हे तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ८८२.६ मिलिमीटर पाऊस झाला असून हा पाऊस सरासरीच्या ८९.३ टक्के इतका आहे. मावळ तालुक्यात आतापर्यंत ५९४.४ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला आहे.
टक्केवारीचा विचार करता दौंड तालुक्याने सरासरी ओलांडली असून येथे आतापर्यंत ६६.३ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १०२.८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात कमी ६३.४ मिलिमीटर पाऊस पुरंदरमध्ये झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ४९.८ टक्के इतकाच आहे.
दुसरीकडे खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चारही धरणात १५.२४ टीएमसी अर्थात क्षमतेच्या ५२.२७ टक्के जलसाठा तयार झाला आहे. गेल्यावर्षी याच तारखेला चारही धरणांमध्ये १४.११ टीएमसी अर्थात ४८.४१ टक्के पाणीसाठा होता.
जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये तुलनेने पाऊस कमी असल्याने खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खडकवासला प्रकल्पातून खरीप आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले.
खडकवासला डाव्या कालव्यातून शनिवारी ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. रविवारी त्यात वाढ करून ७०० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले. तर सोमवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने हा विसर्ग ७०० वरून १००५ क्युसेक करण्यात आला.
जिल्ह्यातील धरणसाठा (टक्क्यांमध्ये)
डिंभे – २७.५४
पानशेत – ५९.२८
वरसगाव – ४६.०९
खडकवासला – ७७.७३
आंद्रा – ४०.३३
नीरा देवघर – ४३.८१
भाटघर – ४९.९५
टेमघर – ३९.९४
पवना – ४५.४५
चासकमान – २९.८६
घोड – ८.८२
खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा
एकूण १५.२४–५२.२७
गेल्या वर्षी १४.११–४८.४१