महाराष्ट्राच्या एक्झिट पोलच्या आकड्यानंतर पायाखालची वाळू सरकलेल्या भाजपने आता थेट जुना मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंसोबत जवळीक करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. ठाकरेंना बाजूला करून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 50 आमदार फोडले अन् राज्यात सरकार उभे केले. आता दोन वर्षे होत आली तरी शिंदेंच्या नेतृत्वाचा भाजपला फायदा होत नसल्याचे कळून चुकले आहे.






दुसरीकडे राजकीय अवसान गळालेल्या ठाकरेंकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आमदार असतानाही भाजपच्या नाकीनऊ आणले. त्यातच एक्झिट पोलच्या आकडचांनी ठाकरेंची पारडे जड दाखवल्याने भाजप नेतृत्वाचे डोळे खाडकन् उघडले असावेत. त्यातूनच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील प्रसाद लाडांच्या माध्यमातून ठाकरेंना फोन केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी सोमवारी (ता.3) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे पुढे आल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला आहे. या फोनमध्ये उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सायंकाळी वेळ मागितली असल्याचे बोलले जात आहे. पण एकीकडे महायुतीचे समन्वयक असलेल्या प्रसाद लाड यांनी ठाकरेंना फोन केल्याचे वृत्त फेटाळले आहे.
मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी 20 मे रोजी मतदान पार पडले. पण हे मतदान सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग करत सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली होती. ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात तपास करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मंद गतीने चालणारी मतदान प्रक्रिया, वगळलेली नावे या सगळ्यांमुळे त्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. या नंतर निवडणूक आयोगाकडे आशिष शेलार यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने कारवाईला सुरुवात केली आहे.













