शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

0

दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. काल (दि. 16) मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अजित पवार नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबतही अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केले आहे. चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज असतील. मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत घ्यायचं नाही हे पवार साहेबांनी सांगितलं आहे, असे त्यांनी म्हटले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

शरद पवार ज्या हॉटेलला मुक्कामी होते. ते हॉटेलला सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्याचे मुद्दाम नाटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये येताना बॅगेत पैसे आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. काल मुख्यमंत्री पुन्हा नाशिकमध्ये आले असता त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. यावर अनिल देशमुख म्हणाले की, आधी आलेल्या बॅगांवर संशय होता म्हणून यावेळी चौकशीचा फार्स केला. बॅगा तपासण्याचे नाटक मुद्दाम केले. मुख्यमंत्र्यांनी केवळ देखावा केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती