देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. निवृत्तीनिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक भावनिक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी आता तुम्ही (मनमोहन सिंह) राज्यसभेत नसून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र यानंतरही तुमचा आवाज देशातील जनतेसाठी बुलंद होत राहणार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रात लिहिले आहे की, तीन दशकांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर आज तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत आहात, आज एका युगाचा अंत झाला आहे.






त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ”तुमच्यापेक्षा जास्त समर्पणाने आणि निष्ठेने त्यांनी देशाची सेवा केली असे फार कमी लोक म्हणू शकतात. देशासाठी आणि जनतेसाठी तुमच्याइतके काम फार कमी लोकांनी केले आहे. तुमच्या मंत्रिमंडळाचा भाग असणे हा माझ्यासाठी वैयक्तिक विशेषाधिकार आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये, मी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेस पक्षाचा नेता असताना, तुम्ही नेहमीच माझ्यासाठी ज्ञानाचे स्रोत राहिला आहात. गेल्या काही वर्षांमध्ये तुमची प्रकृती स्थिर नसतानाही तुम्ही नेहमीच काँग्रेस पक्षासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा उभे राहिला आहेत, त्यासाठी पक्ष आणि मी सदैव तुमचा ऋणी राहील.”
1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. 1991 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी वित्त मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. यानंतर ते 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. आता त्यांचं वय 91 वर्ष आहे.
मंगळवारीच राज्यसभेचे 49 सदस्य निवृत्त झाले आहेत. बुधवारी आणखी पाच जण निवृत्त होणार आहेत. अशा प्रकारे एकूण 54 खासदार निवृत्त होत आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. आरजेडीचे मनोज झा यांनाही पुढील टर्मसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. नसीर हुसेन (काँग्रेस) यांना कर्नाटकातून पुन्हा राज्यसभेवर पाठवले जात आहे.












