राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे. अपात्र आमदारांबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यानंतर आता आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रियेला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै 2022 मध्ये नोंदवण्यात आलेल्या पक्षाची घटना विधीमंडळ मागवणार आहे. त्यानुसार आता खरी शिवसेना कोणाची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.






सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं की, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लवकरात लवकर घेऊ. निर्णय घेताना कुठलाही विलंब होणार नाही. घाई होणार नाही’ असे विधान केले होते. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही गटाकडून पक्षाची घटना मागवली जाणार आहे. यावेळी पक्ष घटनेनुसार चालतो की नाही हे देखील तपासलं जाणार आहे आणि त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र आता पक्षाची घटना दोन्ही गटांकडून मागवण्याऐवजी थेट निवडणूक आयुक्तांकडून मागवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिवसेना हा राजकीय पक्ष नेमका कोणाचा? याकडे आता सर्वांच लक्ष लागलेलं आहे.











