विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व १७ अधिकृत उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी बुधवारी व्यक्त केला. मात्र, काही मतदारसंघांमध्ये अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीतही अंतर्गत बंडखोरी कायम असल्याचे चित्र आहे.






या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस असून, बंडखोरी पूर्णपणे संपवण्यात महायुतीला यश येईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांनी एकत्रितपणे बसून १७ अधिकृत नावे निश्चित केली आहेत. त्यांच्याशिवाय इतर सगळे बंडखोर माघार घेतील, असा विश्वास रवींद्र चव्हाण, तटकरे आणि शेवाळे यांनी पत्र परिषदेत व्यक्त केला.
अपक्ष काही हटेनात, भाजप-काँग्रेसपुढे आव्हान
धाराशिव : उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहेत. ७ अपक्षांनीही अर्ज दाखल केले असून, पैकी ४ अपक्ष उमेदवार हे आघाडीतील मित्रपक्षांचे आहेत.
यवतमाळात मविआला महाधक्का ! उमेदवार कांबळे यांची माघार
यवतमाळ : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि काँग्रेसचे सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला. ऐन लढाईच्या तोंडावर सेनापतीनेच शस्त्र टाकल्याने महाविकास आघाडीची अब्रू चव्हाट्यावर आली. या प्रकारामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरला, मग अचानक ‘पळपुटेपणा’ का? असा संतप्त सवाल केला जात आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. ठाण्यात बसून शिंदे यांनी सूत्रे हलविली आणि इकडे यवतमाळात कॉंग्रेसचा गेम झाल्याची चर्चा आहे.
पुण्यात भाजपचे बंडखोर प्रदीप कंद अपक्ष
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ७ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला आहे. तर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
समीकरण जुळेना
सोलापूरमध्ये भाजपने माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली असली, तरी शिंदेसेनेचे माजी सोलापूर लोकसभा क्षेत्रप्रमुख महेश साठे, शिंदेसेनेचे मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर हे रिंगणात कायम आहेत.
महायुतीतील बंड शमले; जुईली दळवी यांची माघार
अलिबाग/रत्नागिरी : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या जुईली दळवी यांनी आपला अर्ज बुधवारी मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीतील बंड शमले आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांची शिष्टाई यशस्वी झाली असल्याचे बोलले जात आहे. जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्याने आता उद्धवसेनेतर्फे सुरेंद्रनाथ तथा बाळ माने, राष्ट्रवादीतर्फे (अजित पवार) अनिकेत तटकरे, शेकापतर्फे अरविंद पुंडलिक म्हात्रे आणि मानसी संतोष म्हात्रे तसेच अपक्ष अनिल रमेश चोपडा असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विधान परिषद १७ जागा व पक्षीय बलाबल –
1 सोलापूर:
सोलापूर : सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचे सूचक या उमेदवारावर हरकत घेऊन सूचक म्हणून आपली सही नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने अधिकृत अर्ज बाद होण्याची नामुष्की ओढवली. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हा सारा राजकीय खेळ केल्याचे मानले जात आहे.
आता येथे केशव दौलतराव बनगर (राष्ट्रवादी शप), राजेंद्र राऊत (भाजप), नागेश हरिभाऊ बाबराव (अपक्ष), जीवन उत्तमराव जानकर (अपक्ष), धनंजय महादेव डिकळे (अपक्ष), महेश देवीदास साठे (अपक्ष), रमेश नागनाथ बारस्कर (अपक्ष) हे रिंगणात आहेत.
सोलापूर मतदार संघात एकूण मते ६१७
भाजप – ३०४
शिवसेना – ७६
राष्ट्रवादी – ४८
2 अहिल्यानगर
अहिल्यानगर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आणि संपूर्ण नगर जिल्ह्यात कै. अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) यांचे असलेले संबंध यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या मतदारसंघावर कायमच दावा केला जात होता परंतु प्राजक्त तनपुरे (भाजप) यांच्या तर्फे निवडणूक लढण्याची घेतलेली भूमिका यामुळे या भागातील गणिते पूर्णतः बदलली असून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये हा मतदारसंघ गेला आहे. या मतदारसंघांमध्ये करण ससाणे (काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी सुद्धा माहितीकडे या भागामध्ये 60 टक्के बहुमत असल्यामुळे महायुतीसाठी ही जागा सुकर होणार आहे.
अहिल्यानगर एकूण मते – ४५२
भाजप – २०७
शिवसेना – ४४
राष्ट्रवादी – ६४
3 ठाणे
भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यामध्ये महायुतीत असतानाही कायमच संघर्ष असलेल्या जिल्ह्यामध्ये प्राबल्य असलेल्या भारतीय जनता पक्षाला डावलून शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे. रविंद्र फाटक (शिवसेना) यांना पुन्हा या मतदारसंघांमध्ये संधी देण्यात आली आहे. अभिजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट) यांच्यामार्फत नाराज लोकांना हाताशी घेण्याच्या हेतूने विधान परिषदेची रणनीती आखली जात आहे.
ठाणे मतदारसंघांमध्ये एकूण मते – ९९७
भाजप – ४३१
शिवसेना – ३०९
राष्ट्रवादी – १८
4 जळगाव
जळगाव विधान परिषद मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघावर उमेदवारी देण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले. नंदकिशोर महाजन (भाजप) यांना संधी देऊन चंदूभाई पटेल (भाजप) यांची ही जागा भक्कम करण्याचा मानस पक्षाकडून आखला जात आहे. दीपक धांडे (शिवसेना) महायुती बंडखोर यांचे बंड क्षमवण्यात यश आले तरीसुद्धा प्रत्यक्ष मतदानामध्ये टोकाचा झालेला संघर्ष विरळ होतो की तीव्र होतो हे पाहावे लागणार आहे. निष्ठावान शिवसैनिकांना साद घालत शरद तायडे (शिवसेना – ठाकरे गट) यांनी मैदानात उतरून रंगत वाढवण्याचे काम केले आहे.
जळगाव मतदार संघ एकूण मते – ६६७
भाजप – २७४
शिवसेना – २०८
राष्ट्रवादी – ५५
5 सातारा – सांगली
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघांमध्ये माजी आमदार मोहनराव कदम (काँग्रेस) यांच्या जागी सध्या बदललेल्या गणितानुसर सर्वाधिक मताधिक्य असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने निष्ठावान कार्यकर्ता माजी विधानसभा अध्यक्ष धैर्यशील कदम (भाजप) यांना संधी दिली असून त्यांच्यासाठी विजय सुकर मानला जात आहे. बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट) मैदानात पर्याय म्हणून उभ्या असून गेली वर्षभर सुरू असलेला महायुती अंतर्गत संघर्ष किती पथ्यावर पडतो यावरच त्यांचे गणित अवलंबून आहे.
सांगली सातारा मतदारसंघ एकूण मते – ८९८
भाजप – ३७१
शिवसेना – ११०
राष्ट्रवादी – १४५
6 नांदेड
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा आपला ताब्यातील मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कंबर कसली असून अमरनाथ राजूरकर (भाजप) यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. रामदास सुमठाणकर (काँग्रेस) यांनी आपला पारंपारिक विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एल्गार पुकारला असला तरी सुद्धा संख्याबळाचा विचार करता या मतदारसंघांमध्ये महायुती सरस ठरण्याची शक्यता आहे. प्रवीण चिखलीकर (राष्ट्रवादी काँग्रेस) – महायुती बंडखोर, माधव जवळकर (काँग्रेस) – मविआ बंडखोर, कृष्णा आष्टीकर (शिवसेना – ठाकरे गट) – मविआ बंडखोर यांच्या भूमिकाही माजी आमदार अमर राजूरकर यांची गणिते चुकू शकतात.
7 यवतमाळ
यवतमाळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस उरला असताना बुधवारी अचानक माघार घेतली. आता निवडणूक रिंगणात महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी, भाजपचे बंडखोर नितीन भुतडा व दोन अपक्ष उमेदवार आहे.
काँग्रेस पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याला आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची कल्पना कांबळे यांनी दिली नाही. काही नेत्यांनी कांबळे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. काही वेळानंतर कांबळे यांनी माघार घेतल्याची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला.
यवतमाळ मतदारसंघात एकूण मते – ४४६
भाजप – १३५
शिवसेना – १०४
राष्ट्रवादी – २९
8 पुणे
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ७ पैकी ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून, एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला आहे. तर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद अपक्ष म्हणून रिंगणात आहे. विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात असून श्रीकांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – श. प. गट) यांनी या निवडणुकीत आव्हान दिले आहे. प्रदिप कंद (भाजप) – महायुती बंडखोर यांच्या भूमिकेवरच संपूर्ण गणित अवलंबून आहेत. माजी आमदार अनिल भोसले (राष्ट्रवादी) यांची यापूर्वी पुणे जिल्हा बँकेत असलेली ब गटाची जागा सुद्धा याच बंडखोर उमेदवारांनी विजयी केली आहे; आता पुन्हा अनिल बाप्पू यांच्या विधान परिषदेच्या जागेवरही त्यांचेच पुन्हा बंड कोणत्या दिशेला जाणार यावर एकतर्फी निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे.
पुणे मतदार संघामध्ये एकूण मते – ८७८
भाजप – ३३५
शिवसेना – ८२
राष्ट्रवादी – ३७५
9 भंडारा – गोंदिया
भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेली ही जागा पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे यावी यासाठीवअविनाश ब्राह्मणकर (भाजप) तर्फे निवडणूक रिंगणात असून मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने ही विधान परिषद निवडणूक महायुतीसाठी सुकर वाटत आहे. प्रफुल अग्रवाल (काँग्रेस) यांच्यातर्फे रंगात आणण्याचे काम केले असले तरीसुद्धा सुमारे 300 मते महायुतीकडे असून नरेश ईश्वरकर, दिलिप बनसोड (काँग्रेस) – मविआ बंडखोरांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
भंडारा गोंदिया मतदार संघ एकूण मते – ४३६
भाजप – १९६
शिवसेना – १५
राष्ट्रवादी – ८३
10 कोकण
माहितीच्या गटातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना यश मिळाले; परंतु टोकाचा संघर्ष आपल्याकडे खेचण्यामध्ये बाळ माने (शिवसेना – ठाकरे गट) किती यशस्वी होतात त्यावरच मतदारसंघाची गणिते अवलंबून आहेत. जुईली दळवी (शिवसेना) – महायुती बंडखोर यांनी माघार घेतली असली तरी सुद्धा रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) यांना पुन्हा एकदा मिळवण्याची कसोटी आहे
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण मते – ८२३
भाजप – २४१
शिवसेना – २७५
राष्ट्रवादी – १४९
11 नाशिक
नाशिक : नाशिकमध्ये भाजपचे गणेश गीते आणि गोकुळ गीतेंच्या अर्जामुळे महायुतीसमोर आव्हान उभे ठाकले आहे. गीतेंसोबत मुंबईत रात्री उशिरापर्यंत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची बैठक सुरू होती.
नाशिक मतदारसंघात एकूण मते – ६०३
भाजप – १८६
शिवसेना – १६१
राष्ट्रवादी – १०७
12 वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
अरूण लखानी (भाजप)
शैलेश अग्रवाल (काँग्रेस)
: रामदास आलोटकर (भाजप)
वर्धा चंद्रपूर गोंदिया- एकूण मते – २६४
भाजप – १४९
शिवसेना – १
राष्ट्रवादी – १५
13 अमरावती
विदर्भातील एक महत्त्वाचा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाची ओळख असून बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार पूर्वी आपल्या ताब्यात असलेली ही जागा राखण्यासाठी प्रवीण पोते (भाजप) हे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. पक्षीय बलाबलाचा विचार करता अत्यंत अटीतटीच्या लढती असून या मतदारसंघातील निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. हर्षदीप देशमुख (काँग्रेस) यांनी फार पूर्वीपासून या मतदारसघात गणित जुळवण्यास सुरुवात केली असून या मतदारसंघात त्यांची गोळाबेरीज महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे.
अमरावती मतदारसंघात एकूण मते – ४४९
भाजप – १३६
शिवसेना – २३
राष्ट्रवादी – ८३
14 धाराशीव-बीड-लातूर
या मतदारसंघांमध्ये पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाची ताकद असून या मतदारसंघातील आपले प्राबल्य अबाधित राखण्यासाठी महायुती तर्फे बसवराज पाटील (भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. मुळात एकतर्फी असलेल्या या लढतीत महेश देशमुख (काँग्रेस) यांनी लढण्याचा निर्णय घेतला असला तरी सुद्धा त्यांच्या पदरी फारशी यश येण्याची शक्यता नाही. भाजपला सुरेश धस (भाजप) यांची ही जागा पुन्हा मिळवण्यात यश मिळेल अशी शक्यता आहे
धाराशिव लातूर बीड मतदार संघात एकूण मते – ९०४
भाजप – ३७९
शिवसेना – ८०
राष्ट्रवादी – २०२
15 परभणी – हिंगोली
या मतदारसंघांमध्ये शिवसेना शिवसेना पक्षाकडून सर्ईद खान (शिवसेना) निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संधी देण्यात आली आहे. विवेक नावंदर (शिवसेना – ठाकरे गट) यांची थेट लढत होणार असली तरी सुद्धा माजी आमदार विप्लव बाजोरिया (शिवसेना) यांची भूमिका या मतदारसंघांमध्ये महत्त्वाची असून त्यांनी थेट विरोधात भूमिका घेतल्यास या मतदारसंघांमध्ये महायुतीची गणिते बिघडण्यास मदत होणार आहे. विजय जामकर, संग्राम जामकर (राष्ट्रवादी काँग्रेस) – महायुती बंडखोर यांचे बंडसमले असले तरीसुद्धा माहितीच्या उमेदवाराला मदत झाली तरच या मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय शक्य आहे अन्यथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणी हिंगोली मतदारसंघात एकूण मते – ४७३
भाजप – १११
शिवसेना – ७४
राष्ट्रवादी – १२३
16 संभाजीनगर – जालना
पारंपारिक पणे या भागामध्ये शिवसेनेची विधानपरिषदेची जागा यंदा सुहास शिरसाट (भाजप) यांच्यामार्फत मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे गेली असल्याने स्थानिक पातळीवर बंडाचे निशाण फडकवण्यात आले होते. मित्रपक्ष असलेलेसमीर सत्तार (शिवसेना) – महायुती बंडखोर यांचे बंडाचे निशान थंडावले असल्याने ही जागा महायुतीच्या पदरात सहज जाण्याची चित्रे निर्माण झाली आहेत. आपली जागा कायम राखण्यासाठी देवयानी डोणगावकर (शिवसेना – ठाकरे गट) मैदानात उमेदवार उभा केला आहे परंतु पक्षीय बलाबल पाहता महायुतीचा विजय सुकर आहे.
छत्रपती संभाजी नगर – जालना मतदार संघामध्ये एकूण मते – ६४६
भाजप – २५४
शिवसेना – १३९
राष्ट्रवादी – ८६
17 नागपूर
राजीव पोतदार (भाजप) व अतुल लोंढे (काँग्रेस) मधील लढत असून पूर्वी या जागेवर विजयी झालेल्या चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) यांची पक्षाची जागा कायम राखण्यात यश येण्याची शक्यता आहे.
नागपूर मतदार संघात एकूण मते – ७९४
भाजप – ५०१
शिवसेना – ३०
राष्ट्रवादी – ५













