पुण्यात 13 मृत्यूंचं गूढ उलगडलं! घरातच होता ‘मृत्यूचा कारखाना’, कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार मुख्य आरोपीसह 6 जण जेरबंद

0

पुणे शहरात विषारी दारू पिण्याच्या संशयावरून १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फुगेवाडी परिसरातील आठ मृत्यूंनंतर शहराच्या इतर भागांतही पाच जणांचा मृत्यू झाल्याने ही संख्या १३ वर पोहोचली आहे.पोलिसांनी सर्व घटना संशयास्पद मानल्या असून सखोल तपास सुरू केला आहे.

फुगेवाडी परिसरातील घटनांबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नातेवाईकांकडून विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट जबाब मिळालेले नाहीत. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. तरीही पोलिस प्राथमिक माहिती नोंदवून घटनांची सखोल चौकशी करत आहेत.

संशयित विक्रेत्याला अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. गावठी दारू तयार करून पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात विक्री करणाऱ्या वानखेडेवर या मृत्यूंचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याने विक्री केलेली दारूची कॅन पोलिसांनी जप्त केली आहेत.

परिसरात शोककळा

मंगळवारी रात्रीपासून फुगेवाडी परिसरात सलग घटना घडल्याने अवघ्या काही तासांत १३ जणांचा जीव गेला. आनंदवन, काटे वस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या भागांत हंबरडे आणि आक्रोश ऐकू येत आहेत. कालपर्यंत सामान्य जीवन जगणारे नागरिक अचानक गमावल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी- भाजपाचाही दावा;  पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड बाबत या शक्यता

एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू

राठोड कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. विजय राठोड (३१) आणि राजेंद्र राठोड (३४) या दोन भावांचा एकाच वेळी मृत्यू झाला. त्यांच्या आईचे दु:ख शब्दात वर्णन करता येणार नाही. दोन्ही भावांना प्रत्येकी दोन मुले आहेत. ‘आमचे पप्पा कधी येणार?’ असा प्रश्न विचारणाऱ्या चिमुकल्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून परिसरातील प्रत्येकाचे मन हेलावले आहे.

कुटुंबांवर उपासमारीची टांगती तलवार

बाबा शेख (४४) यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ते सुतारकाम करून कुटुंब चालवत होते. इलेक्ट्रिशियन अकबर पठाण (५२) यांच्या निधनाने त्यांचा मुलगा पोरका झाला आहे. राजेंद्र राजपूत (५१), पांडुरंग फुगे (५७) आणि आनंद देसाई (६०) यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा  उपवर्गीकरणामुळे जाती जातीत तेढीचा कुटिल डाव हाणून पाडा मतभेद बाजूला सारून लढ्यासाठी सर्वांनी एकत्र या : आनंदराज आंबेडकर

ईदचा आनंद हरवला

यंदाची बकरी ईद फुगेवाडीतील रहिवाशांसाठी आनंदाची नव्हती. घरोघरी ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्याऐवजी आक्रोश आणि अंत्ययात्रा पाहायला मिळाल्या. अकबर पठाण आणि बाबा शेख यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली. गळाभेटीचा दिवस अंत्यविधीच्या दिवसात बदलला.

एक रुग्णाची प्रकृती गंभीर

अक्षय अवसरमल (२०) या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्यावर वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पुण्यातही पाच जणांचा मृत्यू

पुण्यातही पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हडपसर परिसरातील चार आणि काळेपडळ येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मृतांमध्ये राहुल शरद क्षीरसागर (वय 45), विजय भूकुरलाल शर्मा (वय 45), अरुण डाडर, अशोक रमेश चव्हाण यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पोटदुखी आणि मळमळ यांसारखी समान लक्षणे आढळल्यानंतर या व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, दापोडी येथे आठ जणांचा संशयित विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पुण्यातील या मृत्यूंचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. हडपसर व काळेपडळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. पोस्टमार्टम अहवाल आणि फिर्यादीच्या आधारे पुढील गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  पुण्यात मेट्रोची क्षमता दुप्पट प्रवाशी संख्या 3 लाखांवर पोहोचणार; 6 लाख प्रवासी हाताळण्यासाठी सक्षम सहा डब्यांची मेट्रो खरेदी करणार

इथेनॉलपासून बनावट दारू

या प्रकरणात मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली असून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, आरोपीने मुंबईहून आणलेल्या इथेनॉलपासून बनावट दारू तयार करून ती दापोडी, हडपसर आणि चतुर्शृंगी परिसरातील पुरवठादारांमार्फत विक्रीसाठी दिली होती.

दारूविक्रीबाबत स्थानिक पोलिसांना पूर्वीपासून माहिती

या प्रकरणी योगेश वानखेडेसह आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनी या अवैध दारूविक्रीबाबत स्थानिक पोलिसांना पूर्वीपासून माहिती असल्याचा आरोपही केला आहे.