पुणे : भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक दुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या. घटनेची चौकट बदलण्याचे आणि मोडतोड करण्याचे काम माजी पंतप्रधान पंडीत नेहरुंपासून इंदिरा गांधी यांनी केले असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी रविवारी केला. महायुतीकडून आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले, शाम सातपुते, पुष्कर तुळजापुरकर यावेळी उपस्थित होेते.






भारतीय जनता पक्ष राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसनेच मुळात घटनेची चौकट बदलली आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारले. गेल्या 74 वर्षांमध्ये 105 वेळा घटनेमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 56 वर्षे सत्तेत असणार्या काँग्रेसच्या काळात सर्वाधिक 75 वेळा घटनादुरुस्ती झाली. यापैकी पंडीत नेहरुंच्या काळात 17, इंदिरा गांधी यांच्या काळात 29, राजीव गांधी यांच्या काळात 10 अशा एकंदर 56 घटना दुरुस्त्या नेहरु गांधीच्या परिवाराच्या काळात झाल्या. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या काळात 10 आणि मनमोहन सिंग यांच्या काळात 6 घटना दुरुस्ती झाल्या असल्याचे भंडारी यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात बहुतेक घटना दुरुस्त्या वेगवगेवळ्या सामाजिक आरक्षणाची व्याप्ती किंवा काळ मर्यादा वाढवणार्या होत्या. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देणारी 86 वी दुरुस्ती आणि केंद्र व राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या नियंत्रित करणारी 91 वी दुरुस्ती अशा दोन महत्वपूर्ण व दुरगामी परिणाम करणार्या घटनादुरुस्त्या अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्या. शिक्षणाच्या अधिकारामुळे शिक्षणाचा व्यापक प्रसार व्हायला गती मिळाली. मंत्र्यांच्या संख्येवर निर्बंध घातल्यामुळे मंत्रिमंडळाचा आकार काही प्रमाणात तरी अटोपशीर झाला असल्याचे भंडारी म्हणाले.











