विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ते महायुती सरकारच्या शपथविधीच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याच्या चर्चा सुरू होत्या. शिवाय गृहमंत्रिपद दिलं तरच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार अशी भूमिका त्यांनी घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, शिंदेंच्या या मागणीला भाजपकडून स्पष्टपणे नकार देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे गृहमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस सुरू असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रिपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. शिवाय त्यांनी या खात्यासाठी शिंदे आग्रही नसल्याचाही खुलासा केला आहे.






एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी असं कोणतंही मंत्रीपद मागितलेलं नाही. त्यांनी फक्त 3 ते 4 खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छेनुसार आम्ही मंत्रिपदाबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार आहोत.”
दरम्यान, यावेळी फडणवीसांना मागील सत्ताकाळात गृहमंत्रिपद तुम्ही स्वतःकडेच ठेवलं होतं. त्यामुळे आता हे खातं तु्म्ही सोडणार नसल्याचं बोललं जात आहे, असं विचारलं असता ते म्हणाले, “तसं बघायला गेलं तर गृहमंत्रिपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु ते आमच्याकडेच असावं असा हट्ट नाही. आतापर्यंत हे खातं आमच्याकडे राहिलं आहे.
शिवाय आम्ही तिघंही एकत्रच काम करत आहोत. पण हे खातं सांभाळताना केंद्र सरकारश आणि केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. राज्यात नक्षलवादाची समस्या आहेत. तसंच मुंबईसारखं मोठं शहर सांभाळताना परिस्थिती खूप नाजूकपणे हाताळावी लागते.
माझा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चांगला समन्वय साधू शकतो, असं सागंतानाच त्यांनी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार देखील तो समन्वय चांगल्या प्रकारे साधू शकतात असंही सांगितलं. मात्र, माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येत असल्यामुळे गृहखातं भाजपकडे असावं असं मला वाटतं.”, असं म्हणत फडणवीस यांनी या खात्यावरील आपला दावा मजबूत केल्याचं पाहायला मिळत आहे.













