केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅमेझॉन प्राईमवर स्वराजच्या पहिल्या सीझनचे अनावरण केले आहे. या सीरिजच्या माध्यमातून देशातील कित्येक अपरिचित नायकांची स्टोरी प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज आपल्यासाठी आनंदाचा अन् गर्वाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.






ऑगस्ट २०२२ पासून आझादी अमृत महोत्सवाची सुरुवात झाली आहे. यावेळी त्यांनी स्वतंत्रता संग्राम वीरतेच्या ज्या कथा आहेत त्याविषयी लोकांना फारच कमी माहिती आहे. या सीरिजच्या माध्यमातून त्या लोकांना सांगण्यात येणार आहे.
विकसित भारतावर अधिक जोर…
भारताच्या समृद्ध इतिहासावर अभिमान व्यक्त करत ठाकूर म्हणाले की, जे कुणी आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाचा सन्मान करत नाही त्यांना कोणतेही भविष्य नाही. आपल्या देशाला आणखी बलवान करायचे असेल तर देशातील युवा पिढीसमोर काही आदर्श असायलाच हवेत. येत्या २५ वर्षात आपण आणखी वेगानं भारताला दिशात्मक वळण देण्याचा प्रयत्न कऱणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.
प्रसारभारतीचं केलं कौतुक…..
या मालिकेची निर्मिती करणाऱ्या प्रसार भारतीच्या भूमिकेचं अनुराग ठाकूर यांनी कौतुक केलं आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांचे प्रबोधन करण्यात प्रसार भारतीनं महत्वाचे योगदान दिले आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यावतीनं जी भूमिका वठवली जात आहे ते कौतुकास्पद आहे. यावेळी ठाकूर यांनी ५२ एपिसोडच्या सरदार – द गेम चेंजर नावाच्या मालिकेविषयी उपस्थितांना माहिती दिली.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्तानं १० मार्च पासून दूरदर्शनवर मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, भारतीय सिनेमानं आता त्यांचे वेगळे स्थान जगाच्या पाठीवर तयार केले आहे. कंटेटच्या बाबत भारतीय सिनेमा अग्रस्थानी आहे. त्यामुळे भारतीय कंटेटला जगाच्या विविध देशांतून मोठी मागणी आहे. भारत आता जगातील सर्वात मोठा कंटेट हब झाल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.











