काल मोदींची भेट, आणखी एक मित्रपक्ष NDAमध्ये स्वगृही? महिला आरक्षण आणि पुनर्रचना विधेयकाला आज पाठिंबा थेट

0

शिवसेनेनंतरचा भारतीय जनता पक्षाचा दुसरा जुना मित्र सत्ताधारी एनडीएमध्ये परतण्याची चिन्हं आहेत. २०२० मध्ये भाजपची साथ सोडणाऱ्या शिरोमणी अकाली दल मोठा राजकीय डाव टाकला आहे. पक्षानं महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या नव्या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अकाली दलानं महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे.

शिरोमणी अकाली दलानं घेतलेला मोठा निर्णय पाहता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. अकाली दल आणि भाजप पुन्हा सोबत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात आम आदमी पक्षाचं सरकार आहे. भाजपनं विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली होती. पण आता परिस्थिती बदलताना दिसत आहे.

अधिक वाचा  पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज

चंदिगढममध्ये अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्या निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा झाली. आमचा पक्ष महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याची घोषणा बादल यांनी बैठकीनंतर केली.

मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरुन अकाली दलानं त्यांचा जुना हट्ट सोडला आहे. अकाली दल आता केंद्राच्या नव्या योजनेच्या बाजूनं उभा राहिला आहे. त्यानुसार देशाच्या प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी वाढतील. ‘२०११ च्या जनगणनेला मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडण्यास विरोध केला जात होता. पण आता सगळ्या राज्यांमधील जागा ५० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे पक्षाला कोणतीही अडचण नाही,’ असं पक्षाचे वरिष्ठ नेते दलजीत सिंह चीमा यांनी सांगितलं.

अधिक वाचा  CJPच्या मोहिमेनंतर मोठा निर्णय सरकारी शाळेत प्रवेशावर निर्बंध; फोटो व्हिडिओ काढण्यासही बंदी, माध्यमिक शिक्षण संचालकांचे पत्रक

अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी कालच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अकाली दल शिवसेनेनंतरचा भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. १९९५ मध्ये भाजप-अकाली दलाची युती झाली. पण २०२० मध्ये तीन कृषी कायद्यावरुन अकाली दलानं भाजपची साथ सोडली. यानंतर २०२२ मध्ये झालेली विधानसभा आणि २०२४ मध्ये झालेली लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली. आता ६ वर्षांनंतर अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत.

शिवसेना आणि भाजपची युती १९८९ मध्ये झाली. ही युती २०१४ पर्यंत कायम राहिली. त्यानंतर युती तुटली. मग पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले. पण २०१९ मध्ये युती पुन्हा तुटली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत घरोबा केला. २०२० मध्ये भाजप आणि अकाली दलाचं फिस्कटलं. अकाली दल एनडीएमधून बाहेर पडला. २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना एनडीएमध्ये परतली. त्यानंतर आता अकाली दलदेखील भाजप सोबत पुन्हा जुळवून घेण्याच्या तयारीत आहे.

अधिक वाचा  म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजची कामे आवश्यक उपाययोजना करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना