महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा वातावरण बदलताना दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी येऊ शकतात. यासोबतच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.







सोमवारी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार सरीही कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.
मंगळवार आणि बुधवारी राज्यातील पावसाचा जोर तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांसाठी कोणत्याही जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, ढगाळ वातावरण कायम राहू शकते आणि काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला होता. आता पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.













