दोन अनाथ विद्यार्थिनींना कोंडलं, Whatsapp Status अन्… रात्रभर पुण्यात राडा; काँग्रेस-भाजपामध्ये नेमकं घडलं काय? A To Z माहिती

0

पुण्यामध्ये राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाच्या आदल्या रात्री काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी विंगमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या एनएसयुआय आणि भाजपाच्या अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर आज होणाऱ्या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं की ज्यामुळे एवढा राडा झाला ते जाणून घेऊयात…

काय झालं?

‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच पुण्यातील सीओईपी विद्यापीठ कॅम्पसमध्ये एनएसयुआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. काल रात्री एनएयुआयच्या काही मुली सीईओपी कॅम्पसमध्ये मुलींना उद्याच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुम्ही देखील यावे, असं आवाहन करायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना तिकडे कोंडून ठेवल्याची काँग्रेस कार्यकर्त्यात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे काँग्रेसचे सर्वच नेते तिकडे धावले. त्यादरम्यान मग अभाविपचा एका गट सीओईपी कॉलेजच्या गेट येऊन धडकला त्यातूनच कडक पोलीस बंदोबस्तात दोन्ही गटाकडून तुंबळ घोषणा युद्ध रंगल्याचं बघायला मिळाले. अशातच आता दोन्ही गटांकडून परस्परांना मारहाणीचे प्रकार घडल्याचा आरोप होतोय. यातल्याच दोन किरकोळ जखमी कार्यकर्त्यांना शेजारच्याच संचेती हॉस्पिटल भर्ती केलं असता काँग्रेस नेत्यांची फौज तिकडेही पोहोचली. आनंद दुबे आणि रिहान बाबुडे या पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्तांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यासंदर्भातील माहिती प्रणिती शिंदेंनीही फोनवरुन कॅम्पसमधील विद्यार्थिनींकडून घेतली.

विजय वडेट्टीवार आणि प्रशांत जगताप पोहोचले

अधिक वाचा  समाविष्ट २३ गावांतील ६२६ कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरी! नगरविकास विभागाकडून महापालिकेला पत्र प्राप्त प्रकरण काय?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना वसतिगृहात डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसच्या एनएसयुआयने केला. रात्री अचानक अभाविपचे काही कार्यकर्ते सीओईपी कॉलेजच्या परिसरात आले. त्यांनी या ठिकाणच्या तरुणांना धमकावलं, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत तरुणांना धमकावलं जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सीओईपीमधील या दोन अनाथ मुलींना कोंडून ठेवण्यात आले होते. अभाविपच्या गुडांनी त्या अनाथ विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकत त्यांना मारहाण केली, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रशांत जगताप हे देखील या ठिकाणी दाखल झाले.

काँग्रेसचं म्हणणं काय?

कोंडून ठेवलेली मुलगी घाबरलेली असून तिला भेटू दिलं जात नसल्याचा आरोप एनएसयुआयच्या तरुणींनी केला. तसेच सीसीटीव्ही तपासून कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करुन, “सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवण्याचा एबीव्हीपीच्या गुंडगिरीचा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे!

राहुल गांधी यांचे स्टेटस ठेवलं म्हणून मुलींना धमकावण्याचा आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार एबीव्हीपीच्या गुंडांना कोणी दिला?” असा सवाल विचारला आहे. तसेच, “विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही म्हणून मारहाण, धमकी आणि दहशतीचा मार्ग स्वीकारायचा हीच भाजपच्या विद्यार्थी राजकारणाची संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यात मुलींनी काय विचार करायचा, कोणाचं स्टेटस ठेवायचं हे शिकवण्याची ठेकेदारी एबीव्हीपीने घेतली आहे का?” अशा शब्दांमध्ये सपकाळ यांनी संताप व्यक्त केला. “एबीव्हीपीच्या या गुंडांना सरकारचं संरक्षण आहे का? असेल तर विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुलींच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणाऱ्या गुंडगिरीसमोर काँग्रेस कधीही झुकणार नाही. करारा जवाब मिलेगा!” असा इशाराच सपकाळ यांनी दिला.

अधिक वाचा  पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण होण्याची शक्यता पुढील एक महिना पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज

भाजपाने काय म्हटलं आहे?

दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कॉलेजवर येऊन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलाय. “काँग्रेसच्या काही गुंडांनी, युवक काँग्रेसचे पादाधिकारी, काँग्रेसचे राज्यातील काही वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम सारख्या नेत्यांनी काँग्रेसच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांसहीत जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली. मला असं वाटतं उद्या त्यांचे शहजादे राहुल गांधी उद्या पुण्यात येत आहेत. केवळ उद्याचा कार्यक्रम प्रकाशझोतात यावा. काही राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापिठात ‘वंदे मातरम्’चा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला गालबोट लागावं म्हणून हा रडीचा डाव खेळला आहे. स्वत: आता जाऊन विद्यार्थ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि आता प्रसारमाध्यमांसमोर स्वत: बोंबाबोंब करत आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारलं. याचा भाजपा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत आहे,” असं धीरज घाटे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

अधिक वाचा  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? धर्मेंद्र प्रधान यांच्या पुनरागमनाचीही चर्चा; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

जशास तसे उत्तर; काँग्रेसचा इशारा

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिंनींनी राहुलजी गांधी यांच्या “छात्रो की गूंज” कार्यक्रमाच्या निमित्ताने काही रील्स तयार केले होते व या कार्यक्रमास समर्थन दिले होते. राहुल गांधींच्या या कार्यक्रमास समर्थन दिले म्हणून काही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी तसेच अभाविपने महाविद्यालयातील विद्यार्थ्यानींना दमबाजी करून उद्या होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून परावृत्त केल्याची घटना निषेधार्ह असून या विद्यार्थिनींच्या पाठीशी खंबीरपणे काँग्रेस पक्ष उभा आहे. राहुलजींच्या कार्यक्रमात जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा पुणे पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा काँग्रेस पक्ष अशा उप्रद्रवी लोकांचा आपल्या पद्धतीने बंदोबस्त करेल आणि जशास तसे उत्तर देईल असा इशारा पुणे शहर काँग्रेसचे पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

राहुल गांधी किती वाजता येणार?

दरम्यान, राहुल गांधी ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमासाठी आज दुपारी सव्वा दोन वाजता पुणे विमानतळावर पोहोचतील तिथून ते थेट हॉटेल शेरेटॉनला पोहोचतील. एसएसपीएमएस कॉलेज ग्राउंडवर हा कार्यक्रम होतोय. संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असला तरी राहुल गांधी मात्र तिकडे संध्याकाळी साडे-सहा, सातला थेट स्टेजवर येतील आणि उपस्थित विद्यार्थींशी संवाद साधतील. त्याआधी वातावरण निर्मितीसाठी लाईव्ह कॉन्सर्ट देखील होणार आहे.