सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रिय झाला आहे. कोकण, मुंबई, उपनगरात तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. पालघर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई, उपनगरात पुढच्या पाच दिवस अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.असे असताना आता हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे पंजाबराव डख यांनी राज्यात कुठे कुठे पाऊस होऊ शकतो? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार नाशिक जिल्ह्यातून जी गोदावरी येते त्या नदीला 12 जुलैच्या दरम्यान महापूर येणार आहे. उस उत्पादक शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होईल असे सांगत त्या्ंनी गोदावरीला पूर येणार असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी मोटार, पाईपलाईन काढून घ्यावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.






8 जुलैपर्यंत सगळीकडेच पाऊस होईल
येत्या 12 जुलैपर्यंत नंदूरबार, धुळे, नाशिक या भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. अतिवृष्टी होणार आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर येणार आहे. राज्यात पावसाचा जोर वाढत जाणार आहे. हा पाऊस 8 जुलैपर्यंत सगळीकडेच असेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्याील निळवंडे, भंडारदरा, गंगापूरचे धरण, उत्तर महाराष्ट्रातील छोट्या धरणांत पाण्याची आवक येण्यास सुरुवात होणार आहे. छोटे – छोटे पाझर तलाव आताच्या पावसातच भरून जातील, असं पंजाबराव डख यांनी सांगितलंय.
पश्चिम महाराष्ट्रात काय होणार?
अहिल्यानगर, संगमनेर, अकोला, संभाजीनगर, जालना, अमरावती, बुलढाणा या परिसरातही आठ दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, जिल्हा, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या पट्ट्यातही 3 तीन जुलैपर्यंत पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
विदर्भात आठ दिवसात मुसळधार
मराठवाड्यातही परभणी, हिंगोली, जालना, लातूर, धाराशीव, बीड, जालना, संभाजीनगरात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. विदर्भात आठ दिवसात मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पडेल. या पावसात ओढे-नाले वाहतील. येत्या 8 जुलैपर्यंतच्या काळात मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागात अतिवृष्टी होणार आहे. मुंबई, ठाणे या भागात सखल भागात पाणी साचणार असल्याचं भाकितही त्यांनी केलं आहे.













