संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा चांदीचा रथ साकारण्यात आला आहे. हा रथ पालखी प्रस्थान सोहोळ्यात ८ जुलै रोजी दाखल होईल.पारंपरिक सौंदर्य अबाधित ठेवत रथाचे वजन कमी करण्याचे आव्हान पेलण्यात यश आल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सुलभ होणार आहे.






माऊलींच्या रथाची निर्मिती केआरए अर्थात कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनी केली आहे. याविषयी माहिती देताना विपुल अष्टेकर म्हणाले की, रथ निर्मिती करताना त्याची मजबुती कायम राखत वजन शक्य तितके कमी करणे हे मोठे आव्हान होते. यासाठी केआरए ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंग तंत्रज्ञानाचा वापर करत इपॉक्सी पॉलीस्टर रेझिन आणि कार्बन फायबर बेस यांच्या साहाय्याने रथाची निर्मिती केली. या तंत्रज्ञानामुळे रथाची मजबुती लोखंडा इतकी भक्कम असून त्याचे वजन ॲल्युमिनियमप्रमाणे हलके आहे. या नव्या रथाचे एकूण वजन सुमारे २.८ टन आहे.
शुभ चिन्हांच्या प्रतिकृती
रथाच्या निर्मितीत आळंदी देवस्थानातील शुभचिन्हांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या असून रथाच्या अग्रभागी माऊलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जय विजय यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. रथावरील आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकाम ख्यातनाम शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले आहे. त्यामुळे रथाला धार्मिक परंपरेशी सुसंगत आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस
रथाजवळ होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर व रथाच्या सुरक्षेवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी रथावर १० सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस तंत्रज्ञान बसविण्यात आले आहे. परंपरेचे जतन करत आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून साकारण्यात आलेला हा चांदीचा रथ यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बैलजोड सेवा विभागून
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोड सेवा देण्यावरून सुरू असलेला वाद सामोपचाराने संपुष्टात आला आहे. बैलजोड निवड समितीने अर्ज केलेल्या एकाच परिवारातील तिघांनाही पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसाठी सेवेची संधी देण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला. पालखी सोहळ्यात पुणे जिल्ह्यासाठी हर्षवर्धन रानवडे, सातारा जिल्ह्यासाठी उमेश रानवडे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी तुळशीराम रानवडे हे बैलजोड सेवा देणार आहेत. पालखी सोहळ्याची परंपरा आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन समितीने तिन्ही अर्जदारांना सेवा विभागून दिली आहे.













