पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत लोकसभेचे उट्ट काढलं; ‘माझी कबर खोदू शकत नाही; कुटुंबाच्या ‘स्टार्टअप’ला…’

0

काँग्रेसला आपले सलग पराभव आणि माझा उदय पचनी पडत नाहीये. त्यामुळेच ते माझ्या मृत्यूची इच्छा धरत आहेत. मात्र, देशातील करोडो जनतेचे आशीर्वाद हे माझे संरक्षण कवच आहे. काँग्रेसने कितीही घोषणाबाजी केली, तरी ते माझी कबर कधीच खोदू शकणार नाही,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी सुमारे १०० मिनिटांचे भाषण केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या धोरणांवर सडकून टीका केली.

संविधानाचा अपमान आणि शीख समुदायाचा मुद्दा –

सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळावर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “एका गरीब आदिवासी महिलेचा राष्ट्रपती म्हणून सन्मान करणे विरोधकांना जड जात आहे. हा केवळ राष्ट्रपतींचाच नाही, तर संविधानाचाही अपमान आहे. त्यामुळे ज्यांनी संविधानाचा अनादर केला, त्यांना संविधानावर बोलण्याचा कोणताही हक्क नाही,” असे मोदी म्हणाले.

अधिक वाचा  कर्वेनगरमध्ये मुठा नदी जलपर्णी काढण्यास सुरुवात; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांच्या प्रयत्नाला यश

तसेच, राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्याबाबत केलेल्या ‘गद्दार’ या विधानाचा समाचार घेताना पंतप्रधान म्हणाले की, ही केवळ एका व्यक्तीची टीका नसून संपूर्ण शीख समुदायाचा अपमान आहे. काँग्रेसच्या संस्कृतीतच लोकांचा अपमान करणे भिनलेले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘मोहब्बत की दुकान’ की द्वेषाचे राजकारण?

काँग्रेसच्या ‘मोहब्बत की दुकान’ या घोषणेवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, “एकीकडे प्रेमाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ अशा घोषणा द्यायच्या, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या ‘स्टार्टअप’ला (राहुल गांधी) यश मिळत नसल्याने आलेल्या निराशेपोटीच काँग्रेस अशा प्रकारची खालच्या पातळीची टीका करत आहे.”

अधिक वाचा  स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निम्मित कर्वेनगर मधील मावळ्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण

ममता सरकारवर निशाणा

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले की, टीएमसी सरकार घुसखोरांना संरक्षण देत आहे. यामुळे तिथल्या तरुणांच्या नोकऱ्या आणि आदिवासींच्या जमिनी हिरावल्या जात आहेत. अशा ‘निर्दयी’ सरकारमुळे बंगालच्या जनतेचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशाची प्रगती आणि भविष्याचा वेध –

आपल्या सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील यशाचा पाढा वाचताना पंतप्रधानांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. कलम ३७० हटवणे, ईशान्येतील हिंसाचार संपवणे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे यामुळे विरोधक अस्वस्थ आहेत. भारत आता ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर स्वार झाला असून २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय गाठणारच. युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत झालेले व्यापार करार भारताच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक आहेत. पूर्वी ‘डिल’ म्हणजे ‘बोफोर्स’ भ्रष्टाचाराची आठवण व्हायची, पण आता व्यापार करारांकडे जग अभिमानाने बघत आहे.

अधिक वाचा  असंख्य दिव्यांगांच्या आयुष्यात नवी पहाट! पुन्हा उमलले हासू; ना. चंद्रकांतदादा यांची अशी ही संवेदनशीलता

विरोधकांचाही सभात्याग –

पंतप्रधानांचे भाषण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सभात्याग केला. विरोधकांच्या अनुपस्थितीतच राज्यसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर केला.