काँग्रेसला डावलून ‘महायुती’चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला! ‘शरद पवार गटही सोबत आला तर ..’; ज्येष्ठ नेत्याचे मोठे विधान

0

”महापालिकेत भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनालाही सोबत घेणार आहोत. शिवाय आमच्यासोबत येण्याची तयारी दर्शविली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही काय देता येईल, ते पाहू. महापालिकेत काँग्रेस सोडून सर्वांना सत्तेत सोबत घेऊ,” असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून आज अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर दोघांनी अर्ज दाखल केले. आमदार सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, किसान मोर्चाचे प्रदेश संघटक पृथ्वीराज पवार, दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  हरित पुणे १०८ कोटी लाटले पण १० टक्केच काम; काँग्रेस गटनेते ॲड. चंदूशेठ कदम यांच्याकडून कारभार चव्हाट्यावर

पालकमंत्री पाटील म्हणाले, ”भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीने धीरज सूर्यवंशी यांचे नाव एकमताने निश्चित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याला संमती दिली. महापौरपदासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहा-दहा महिन्यांचा कालावधी न करता दोन टप्पे करावेत असे सुचविले आहे. मात्र, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेबाबत ज्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल.

शिवसेनेचे दोन सदस्य असून, त्यांनाही सोबत घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सोबत येण्यास तयार असल्यास त्यांना काय हवे, काय देऊ शकतो, हे पाहू आणि त्यांनाही घेऊ. सध्या भाजपचे ३९, राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ आणि शिवसेनेचे दोन असे ५७ सदस्य महायुतीचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामील झाल्यास हे संख्याबळ साठवर जाईल.”

अधिक वाचा  पंढरपूर यात्रेचे नियोजन ठरले कौतुकास्पद; मंत्री जयकुमार गोरे यांचा राजा माने यांच्या हस्ते सत्कार

‘जिल्हा परिषदेतही भाजपच’

पालकमंत्री पाटील म्हणाले, ”पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्हा परिषदेत भाजपला ६१ पैकी ३४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पोलिसांच्या माहितीवरून ३२ जागांचा अंदाज आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसांत प्रयत्न केल्यास ३८ जागांपर्यंत जाऊ; पण जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येईल.”

‘शल्य दूर करण्याचा प्रयत्न’

धीरज सूर्यवंशी यांना गेल्या सभागृहात उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतिपद दिले असताना, पुन्हा महापौरपदासाठी का निवडले? याबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, ”गेल्या वेळी महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षातल्या सहा जणांनी बंडाळी केल्याने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना पडले. त्याचे शल्य होते. त्यामुळे त्यांना संधी दिली आहे.”

अधिक वाचा  पुणे शहरात 42 टक्के मतदारांची नावे वगळली जाणार आठ मतदारसंघ प्रारूप मतदार यादीनुसार वगळलेली मतदारांची संख्या

गुन्हेगारांवर दहशत हवी’

वाढत्या गुन्ह्यांबाबत पालकमंत्री पाटील म्हणाले, ”गुन्हेगारांवर दहशत बसविणे हे पोलिसांचे काम आहे. गुन्हेगारांना अटक करणे, तपास करून आरोपपत्र दाखल करणे हे सर्व तातडीने झाले पाहिजे. आचारसंहिता संपल्यानंतर १२ फेब्रुवारीला आढावा बैठक घेणार आहे. ब्लॅक स्पॉटवर विशेष नजर राहील. बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नियोजन समितीतून ट्रॅप कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत. या कॅमेऱ्यात बिबट्या दिसला की सायरन वाजेल. त्यामुळे सर्वांना इशारा मिळेल आणि जीवितहानी टाळता येईल. हे कॅमेरे जंगलाजवळच्या भागात तसेच बिबट्याचे हल्ले झालेल्या भागात बसविले जाणार आहेत.”