पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, कासारसाई, मुळशी, चासकमान, भामा आसखेड, आंद्रा आणि वडिवळे ही धरणे भरली आहेत. त्यामुळे या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून दौंडवरून उजनी धरणात ६० हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे. सध्या धरण ९० टक्के भरले असून उद्या (मंगळवारी) सकाळीच धरण १०० टक्के भरेल, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.







सोलापूर जिल्ह्यात मॉन्सून हंगामात जून-जुलैमध्ये महिन्यात १० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना २२ जुलैपर्यंत सरासरीच्या निम्मासुद्धा पाऊस झालेला नाही. ऐन पावसाळ्यात शेतीसाठी उजनीतून पाणी सोडावे लागले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यापासून उजनीत धरण परिसरातून २ टक्के सुद्धा पाणी आलेले नाही. मात्र, पुणे जिल्ह्यातील पावसामुळे पुन्हा एकदा उणे २८ टक्क्यापर्यंत पोचलेले उजनी धरण १०० टक्के भरू लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यातील बहुतेक पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
उजनीतून शेतीसाठी सोडले पाणी
उजनीतून सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ३७० क्युसेक, बोगद्यातून ९०० क्युसेक, कालव्यातून दोन हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरणात सध्या ११० टीएमसी एकूण पाणीसाठा असून त्यात ४६ टीएमसी उपयुक्त साठा आहे. सोलापूर जिल्ह्यात अजूनही सरासरीपेक्षा निम्मा देखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात धरणातून पाणी सोडावे लागले आहे. बोगद्यातून सोडलेले पाणी कंदरजवळील भीमा-सीना जोड कालव्यातून सीना नदीद्वारे पुढे येत आहे.
सोलापुरात पाऊस नाही, तरी धरण १०० टक्के
सोलापूर जिल्ह्यात जून-जुलैमध्ये सरासरीच्या निम्मा सुद्धा पाऊस झालेला नाही, विशेषतः उजनी धरण क्षेत्रात एकही मोठा पाऊस झालेला नाही. तरीदेखील, उन्हाळ्यात उणे २८ टक्क्यांपर्यंत पोचलेले उजनी धरण सध्या १०० टक्क्यांकडे वाटचाल करीत आहे. पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरण भरत आहे. मागील ४६ वर्षांत जवळपास १७ वेळा असे घडल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.












