मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असून कोकण, मुंबई, पालघर या किनारपट्टीच्या भागांसह विदर्भातही पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. 5 जुलै रोजी एकट्या मुंबईत तब्बल 225 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, ज्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले. सुरुवातीला मान्सून उत्तर भारतात न पोहोचता मध्यप्रदेशच्या काही भागांत रेंगाळला होता, मात्र आता राजस्थानचा काही किरकोळ भाग वगळता संपूर्ण भारत मान्सूनने व्यापला आहे. महाराष्ट्रात अचानक निर्माण झालेल्या या अस्मानी संकटामागे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी निर्माण झालेल्या तब्बल चार वेगवेगळ्या वेदर सिस्टीम्स (हवामान प्रणाली) कारणीभूत आहेत. या सर्व प्रणाली एकत्र आल्याने मान्सून प्रचंड वेगाने पुढे सरकला असून महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे.







मुसळधार पावसाचे मुख्य कारण काय?
या मुसळधार पावसाचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला तयार झालेला एक ‘वेल मार्क लो प्रेशर एरिया’ (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) हे आहे. साधारणपणे कमी दाबाचे क्षेत्र लवकर विरून जाते, मात्र या सिस्टीमची तीव्रता सलग काही दिवस कायम राहिल्याने मोठ्या प्रमाणावर आर्द्रता (मॉइश्चर) खेचली गेली. दुसरीकडे, राजस्थानपासून थेट झारखंडपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) तयार झाला असून, तिथेच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन (चक्रीय अभिसरण) देखील सक्रिय आहे. या चक्रीय अभिसरणामुळे नैऋत्य मान्सूनचे वारे वेगाने भारताच्या भूभागाकडे सरकत आहेत.यासोबतच, गुजरातपासून बांगलादेशपर्यंत आणि गुजरातपासून खाली संपूर्ण कोकण किनारपट्टीपर्यंत दोन स्वतंत्र कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकल्याने मान्सूनला मोठी गती मिळाली. त्याच वेळी अरबी समुद्रातूनही महाराष्ट्राच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वाहू लागल्याने दोन्ही समुद्रांकडून पाऊस कोसळण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले.
पुढील तीन दिवस काय?
हवामान खात्याने दिलेल्या आगामी तीन दिवसांच्या अंदाजानुसार, मंगळवारी (7 जुलै) सुरुवातीला मुंबईसाठी असलेला रेड अलर्ट बदलून आता तो ‘येलो अलर्ट’ करण्यात आला आहे, कारण मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला होता; तरीही संध्याकाळच्या सुमारास मुंबईत मुसळधार सरींची शक्यता आहे. मात्र, पालघर, नाशिक, पुणे, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट माथ्याच्या परिसरासाठी अतिवृष्टीचा ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता नसली, तरी तिथे जोरदार पाऊस पडेल. याशिवाय नंदुरबार, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, वाशिम, वर्धा आणि नागपूर या भागांत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाऊस कधी विश्रांती घेणार?
बुधवारी म्हणजे 8 जुलै रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला, तरी पुणे आणि साताऱ्याच्या घाट भागाला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या शक्यतेसह ‘येलो अलर्ट’ असेल. उर्वरित महाराष्ट्रात या दिवशी कोणताही अलर्ट नसून पावसाचा जोर ओसरलेला दिसेल.
यानंतर 9 जुलै रोजी (गुरुवारी) पाऊस आणखी विश्रांती घेण्याची चिन्हे असून, केवळ विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि पश्चिम महाराष्ट्रातील रत्नागिरीसह पुणे-साताऱ्याच्या घाट भागात ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल हा हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवे असो की शहरांमधील रस्ते, ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. पुढील दोन-तीन दिवस ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून हवामान खाते आणि सरकारने नागरिकांना विनाकारण किंवा आणीबाणीच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे.













