इतके दिवस ज्यांच्याविरोधात त्यांच्याच मांडीला मांडी लावून का? भाजप पदाधिकाऱ्याचा प्रश्न

0

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सरकारला समर्थन दिलं आणि थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सहमती नसतानाही अजित पवारांना आपल्या सहकाऱ्यांसह वेगळा निर्णय घेण्यास भाग पाडून भाजपने कुरघोडी केल्याची चर्चा रंगत आहे. मात्र भाजपची ही खेळी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याला रुचली नसून सदर पदाधिकाऱ्याने भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  शरद पवार अजितदादांची अंतिम इच्छापूर्ती करणार का? अजित पवारही होते आग्रही; 16 जानेला चर्चाही झाली

पुणे ग्रामीण भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे पुणे जिल्ह्यात मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढे दिवस ज्यांच्याविरोधात काम केले आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कालचा शपथविधीने भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार? मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना? आम्हा निष्ठवंतांची काही सोय केलीये का? असे पत्राद्वारे पाच प्रश्न पारखी यांनी फडणवीसांना विचारले आहेत. साहेब जमलं तर जरूर उत्तर द्या, अशी सादही त्यांनी घातली आहे. आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता काय करायचे, असा प्रश्नही नवनाथ पारखी यांनी फडणवीसांना विचारला आहे.
दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्याच्या या पत्रामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचे समोर आले आहे.

अधिक वाचा  स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निम्मित कर्वेनगर मधील मावळ्याच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण