पुणे – केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असताना गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साठणारी ठिकाणे किती कमी केली? ज्या ठिकाणी काम केले तेथे पाणी का साचते? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज महापालिका प्रशासनाची कडक शब्दांत झाडाझडती घेतली. पुणेकरांना पावसाळ्यात समस्या निर्माण होईल, असे एकही ठिकाण शहरात नको, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.







शहरात पावसाचा बदललेला कल आणि त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ यांनी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी महापौर मंजूषा नागपुरे, आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. शहरात १२० पाणी साठणारी ठिकाणे (क्रिटिकल पॉइंट्स) असून, त्यापैकी ८५ ठिकाणांची कामे पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला. त्यावर, कामे झालेल्या ८५ पैकी किती ठिकाणी यंदा पाणी साचले नाही, असा प्रतिप्रश्न मोहोळ यांनी करताच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. या ठिकाणांचे पाऊस सुरू असतानाचे छायाचित्रे पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पावसाचा ‘ट्रेंड’ बदलला
गेल्या काही वर्षांत कमी वेळेत अधिक पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बदलत्या ‘ट्रेंड’नुसार महापालिकेने काय तयारी केली, असा सवाल मोहोळ यांनी केला. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जनतेला उत्तरे द्यावी लागतात, त्यामुळे दीर्घकालीन नियोजन करून हे प्रश्न सोडवावे लागतील. सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष तातडीने कार्यान्वित करावा आणि नदीपात्रात ‘फ्लड सेन्सर’ची संख्या वाढवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. वॉर्ड ऑफिसरनी स्थानिक पातळीवर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खड्डे बुजवण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक
शहरातील खड्ड्यांच्या समस्येवरही बैठकीत चर्चा झाली. खड्ड्यांची माहिती मिळताच ते तातडीने बुजवण्यासाठी विशेष पथके तैनात ठेवावीत, असे निर्देश देण्यात आले. नागरिकांना खड्ड्यांची तक्रार थेट महापालिकेपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देण्याची सूचना मोहोळ यांनी केली. पावसाळ्यात पुणेकरांना रस्ते आणि पाणी साचण्याच्या समस्यांपासून दिलासा देण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.













