पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं असून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आषाढी वारीलाही पावसाचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये,” असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.







वारकरी, भाविक व नागरिकांना आवाहन करताना प्रशासनाने म्हटलं आहे की, “कृपया पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणं टाळावं. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून सहकार्य करावं, ही नम्र विनंती.”
पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “सिंहगड घाट परिसर हे दरडप्रवण क्षेत्र असल्यामुळे मुसळधार पावसाने दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, दगड घसरणे, रस्त्यावर पाणी साचणे व इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश आज आणि उद्या तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे,” अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे
आषाढी वारीसाठी जय्यत तयारी
आषाढी वारीच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत १२ ते १५ लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात. यातील लाखो भाविक भीमा नदीच्या तीरावर स्नान व दर्शनासाठी येत असतात. मात्र, नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना वाळवंटात कचरा व कचरायुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात पडलेल्या असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीमा नदीच्या वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः वाळवंटातील कचरा उचलून या मोहिमेची सुरुवात केली. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा २५ जुलै रोजी असून, यात्रा कालावधी १५ ते २९ जुलै असा आहे. या यात्रेत येणाऱ्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तिसागर (६५ एकर) येथे जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉट भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. आज, सोमवारपासून प्लॉट नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. संबंधितांनी प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. या ठिकाणी एकूण ६६८ प्लॉट भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात.













