मुळशीकरांचा एकजुटीचा निर्धार : मुळशीची बदनामी थांबवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन

0

मुळशी : मुळशी तालुक्याची ओळख आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी मुळशीतील नागरिकांनी पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या मुळशीकरांना एकत्र येण्याचे जोरदार आवाहन केले आहे. “मुळशीकर म्हणून सर्वांनी एकजुटीने पुढे या आणि मुळशीची बदनामी थांबवा,” असा ठाम संदेश देत या संदर्भात एक लोकचळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्रात कुठेही कोणतीही घटना घडली की त्याची तुलना मुळशीशी केली जाते, ही बाब गंभीर असल्याचे नागरिकांनी नमूद केले. यापुढे कोणीही मुळशीचे नाव चुकीच्या संदर्भात वापरू नये, यासाठी जाहीर ठराव मंजूर करण्यात आला आहे.

मुळशी तालुका हा वारकरी संप्रदायाने गौरवलेला, शेतकरी, महाराष्ट्र केसरी पैलवान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, तसेच प्रशासनातील तहसीलदार, पोलीस, डॉक्टर, वकील, अभियंते आणि गुणवंत विद्यार्थी घडवणारा आहे. उद्योजक, व्यवसायिक, माजी सैनिक यांची परंपरा लाभलेला हा लाल मातीचा, गडकिल्ल्यांनी आणि सह्याद्री पर्वतरांगांनी नटलेला ऐतिहासिक तालुका आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सरदार, सेनापती यांचा वारसा मुळशीला आहे. तसेच सेनापती बापट यांचा सत्याग्रह आणि मामासाहेब मोहोळ यांच्या कुस्तीची परंपरा मुळशीच्या इतिहासात विशेष स्थान राखते.

अधिक वाचा  शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? सिब्बल यांचा अखेरचा मास्टरस्ट्रोक, हे मुद्दे खटलाच पालटतील? A टू Z माहिती

या उपक्रमाला पुणे शहरातील विविध गणपती मंडळे, देवी मंडळे आणि सेवा सोसायट्यांनी लेखी पाठिंबा दर्शवला असून, उपस्थित नागरिकांनीही जाहीर संमतीपत्र देत या चळवळीला समर्थन दिले आहे. यावेळी मुळशीतील राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, वारकरी, टाळकरी तसेच उद्योजक आणि तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होती. मुळशीची ओळख जपण्यासाठी आणि बदनामी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली.