सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि महायुतीकडे संख्याबळ असल्याने निवडणूक सोपी मानली जात असली तरी मतदानाची वेळ जवळ येत असताना विविध मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ लागले आहेत. स्वतः राजेंद्र राऊत यांनी मोठ्या मताधिक्याचा दावा केला असला, तरी जिल्ह्यातील काही जुने राजकीय वाद आणि स्थानिक समीकरणे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना वरकरणी बहुमताची मजबूत साथ असल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या वाटेत अनेक राजकीय अडथळे उभे राहत असल्याची चर्चा सुरू आहे.






सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरण
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित प्रकरण राऊत यांच्या अडचणींमध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा झाला आहे. महायुतीचे उमेदवार असलेल्या राजेंद्र राऊत यांनी बँकेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर न्यायालयात धाव घेतली होती. राऊत यांनी मात्र आपण शेतकऱ्यांची बँक वाचवण्यासाठी भूमिका घेतल्याचे सांगत या आरोपांचे खंडन केले आहे. त्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते अडचणीत आल्याची चर्चा झाली होती. त्यानंतरच राजकीय परिस्थिती बदलली असून त्यातील अनेक नेते आता भाजप किंवा महायुती सोबत आहेत. त्यामुळे त्या काळातील घडामोडी आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी निवडणुकीत परिणाम करू शकते का, याकडे लक्ष लागले आहे.
दोन्ही बाजूंनी जोरदार संपर्क मोहिम
सोलापूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत नाराजीचाही मुद्दा चर्चेत आहे. संपूर्ण विधान परिषद निवडणुकीची राबविण्यात आलेली उमेदवारी प्रक्रियेमुळे काही भागांत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध नेत्यांमधील मतभेद आणि गटबाजीचाही फटका निवडणुकीत बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांकडूनही या मुद्द्यांवर जोरदार राजकारण सुरू असून स्थानिक स्तरावरील मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सध्या माहितीकडे बहुमताचा आकडा असला तरी सुद्धा या मतदारसंघातील ही निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
बाजी कोण मारणार?
सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक या निवडणुकीचा इतिहासही अनेक अनपेक्षित निकालांचा साक्षीदार राहिला आहे. त्यामुळे केवळ संख्याबळावर विजय निश्चित मानणे धोकादायक ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्याभोवतीही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार संपर्क मोहीम सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत अडचणींवर मात करतात की वसंतराव देशमुख बाजी मारतात, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे सध्या लक्ष लागले आहे.











