मागील काही महिने थंडावलेले ऑपरेशन टायगर आता पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आता पुन्हा नॉट रिचेबल होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्ली दौरा केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याची संपूर्ण रणनीती दिल्लीत आखली गेल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.






या दौऱ्यात शिंदे यांनी गेम फिरवल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ७ जून रोजी दिल्लीत ठाकरे गटाच्या या खासदारांसोबत एक ‘अतिगुप्त’ बैठक घेतली. या बैठकीच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या बैठकीत ठाकरे गटाचे ९ पैकी ७ खासदार होते. या नव्या भूकंपामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिपदाची ‘ऑफर’, खासदार फोडण्याचा मुहूर्त ठरला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी शिंदे गटाने कंबर कसली आहे. फुटीच्या तयारीत असलेल्या ७ खासदारांपैकी एका खासदाराला थेट ‘मोदी मंत्रिमंडळात’ मंत्रिपद दिले जाणार असून, यामध्ये मराठवाड्यातील एका बड्या खासदाराच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर उर्वरित इतर खासदारांनाही दिल्लीत मानाचे स्थान दिले जाईल, असे थेट आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, या गुप्त बैठका शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील बंगल्यावर पार पडल्याचे उघड झाले आहे.
‘ऑपरेशन टायगर’साठी ६ महिन्यांची छुपी फिल्डिंग!
‘ऑपरेशन टायगर’साठी गेल्या ६ महिन्यांपासून अत्यंत चोख रणनीती आखली जात होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून ठाकरे गटाच्या या खासदारांच्या संपर्कात होते. श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीत या खासदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांचे मन वळवले होते. मध्यंतरी भाजपने या फोडाफोडीला ‘तूर्तास’ ब्रेक लावण्यास सांगितले होते, मात्र ७ जूनला एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी या ‘मिशन’ला अंतिम रूप दिले असल्याचे वृत्त ‘दैनिक पुढारी’ने दिले आहे.
कोणते खासदार ‘नॉट रिचेबल’ होणार?
ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण ९ खासदार आहेत. सूत्रांच्या दाव्यानुसार, मुंबईतील २ खासदार वगळले, तर उर्वरित सर्व ७ खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यास सज्ज झाले आहेत. दिल्लीत या ७ खासदारांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या ‘ऑपरेशन’वर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
दरम्यान, या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांचीही वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याने, शिंदे गटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे मातोश्रीवर मात्र चिंतेचे ढग जमा झाले आहेत. आता हा राजकीय वणवा कधी पेटतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












