देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावे अशीच सर्वांची भूमिका आहे, डीएमके पक्ष यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असला तरी आम्ही सगळे मिळून चर्चा करुन यातून काहीतरी चांगला मार्ग काढू असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. पुढील तीन वर्षे आता कोणत्याच निवडणूका नसल्याने सर्वांना एकत्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते. पवार म्हणाले, देशात सध्या दोन प्रमुख राजकीय गट दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व त्यांचे सहकारी यांचा एक गट व ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत असा दुसरा गट आहे.






नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत विरोधी गटातील लोक काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढले. डीएमके विरोधी आघाडीतून बाहेर पडतेय असे आजचे चित्र असले तरी प्रमुखांना आठ दहा दिवसांनी बोलावून यातून काहीतरी मार्ग काढू, मार्ग निघेल याची मला खात्री आहे, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. खासदार सुप्रिया सुळे आज ज्याबैठकीला गेलेल्या आहेत, ती बैठक आढावा घेण्यासाठीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये असे सूत्र या बैठकीत मांडले जाईल,
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील अटी जाचक असल्याच्या तक्रारी आहेत, या बाबत विचारता पवार म्हणाले, सरकार जेव्हा कर्जमाफीचे सूत्र ठरवते, त्यात काही अडचणी असतील तर त्यातून चर्चेद्वारे मार्ग काढता येऊ शकतो. यातील कमतरता दूर करुन शेतक-यांना मदत कशी करता येईल हे पाहिले पाहिजे.
वादळी वारे व अतिवृष्टीने शेतक-यांचा नुकसाना झाले आहे, ही वस्तुस्थिती आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या पाच शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन आपला अहवाल दिलेला आहे, निसर्गापुढे काही चालत नाही पण यातून काय मार्ग काढणे शक्य आहे ते बघू, असे ते म्हणाले.













