उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; १९ जिल्ह्यांत मनुष्यहानी, पशुधन हानी आणि पिक नुकसानीच्या घटना

0

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे किमान १११ जणांचा मृत्यू झाला असून ७२ जखमी झाले आहेत. यात अनेक झाडे उन्मळून पडली आणि कित्येक घरांचे नुकसान झाले.बाराबंकी, बहराईच, कानपूर देहात, बस्ती, संभल, हरदोई आणि उन्नाव यांसह किमान १९ जिल्ह्यांत मनुष्यहानी, पशुधन हानी आणि पिकांच्या नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत.

प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे झाडे आणि वीजखांबही उन्मळून पडले. त्यापैकी अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहने चिरडली गेली आणि घरांचे नुकसान झाले. यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या वादळात ८७ घरांचे नुकसान झाले. या घटनांची पडताळणी करून बाधितांना मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

अधिक वाचा  शनिवारवाड्यात शंभूपुत्र शाहू महाराज पुतळा, शाईफेकी निषेधासह १९ ठराव मंजूर! विद्रोही साहित्‍य संमेलनाचा समारोप

एक व्यक्ती ५० फूट उडाला

भीषण वादळामुळे झालेल्या नुकसानीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यापैकी बरेलीतील बमियाना गावातील एक व्हिडिओ विशेष चर्चेत राहिला. त्यात वाऱ्याच्या तडाख्यामुळे नन्हे मियाँ हे छपरासह ५० फूट हवेत फेकले जाऊन शेतात पडताना दिसले. वादळाच्या वेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी मियाँ यांनीटिनशेड पकडून ठेवले होते. मिर्झापूरच्या गौरा प्रमाणपूर येथेही पाँटून पूल खराब झाला असून, त्यामुळे २० गावांचा संपर्क तुटला आहे.