पुण्यात येणाऱ्या व्हीआयपी दौऱ्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा ताफा आता निम्म्यावर येणार आहेत. इंधन बचत, सरकारी खर्चावर नियंत्रण आणि साधेपणाला प्राधान्य देण्याच्या राज्य व केंद्र सरकारच्या भूमिकेनुसार पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकारनेही विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ प्रभावाने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाहेरच्या दौऱ्यांदरम्यान निर्धारित संख्येपेक्षा अधिक वाहने ताफ्यात नसतील, याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.






त्यानुसार आता पुण्यात देखील ताफ्यातील वाहने कमी होणार आहेत. याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पूर्वी एखाद्या व्हीआयपी दौऱ्यासाठी सुरक्षा आणि राज शिष्टाचारनुसार साधारण १२ ते १३ वाहनांचा ताफा ठेवला जात होता. मात्र, आता ही संख्या कमी करून केवळ ५ ते ६ वाहनांपर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अनेक व्हीआयपी व्यक्ती स्वतःहून फोन करून आपल्या दौऱ्यात कमीत कमी वाहनांचा वापर करण्याची विनंती करत असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.
ताफा कमी झाल्याने वाहतूक कोंडीतूनही दिलासा?
शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या कायम असते. त्यात व्हीआयपी दौऱ्यावेळी मोठा वाहनताफा रस्त्यावर उतरल्याने संबंधित परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत होत होती. अनेकदा सिग्नल बंद ठेवून वाहतूक रोखावी लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आता व्हीआयपी ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचा निर्णय झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आवश्यक सुरक्षा कायम ठेवत व्हीआयपी ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यानुसार आता दौऱ्यांची आखणी केली जात आहे.
– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर













