ममतांच्या सत्तेला सुरुंग लावणारे ते ‘मुद्दे’ नक्की कोणते? ज्यामुळे निकाल पालटले

0

सध्या देशातील राजकारणातील महत्त्वाचे राज्य असलेल्या पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. या पाच राज्यातील एकूण ८२४ जागांची मतमोजणी केली जात आहे. सकाळी ८ वाजता पोस्टल मतपत्रिकांनंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील सध्याचे कल पाहता भाजपने बहुमताचा १४८ हा आकडा पार करुन १७० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. जर हेच कल कायम राहिले, तर बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते.

मात्र माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूरमध्ये ममता आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. कधी ममता आघाडीवर असतात, तर कधी सुवेंदू अधिकारी अशी तगडी खेळी सध्या सुरु आहे. इतर राज्यांतही चित्र स्पष्ट होत असून, आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेकडे झुकताना दिसत आहे, तर तामिळनाडूत अभिनेता विजय यांचा टीव्हीके (TVK) पक्ष अनपेक्षितपणे आघाडी घेत प्रस्थापित पक्षांना कडवे आव्हान देत आहे.

अधिक वाचा  बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के संकेतस्थळ ट्रॅफिक टाळण्यासाठी हे पाऊल ; यंदा २.९ टक्क्यांनी घट 

पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीत हे मुद्दे अत्यंत प्रभावी ठरले आहेत. ते फॅक्टर कोणते याबद्दल आपण जाणून घेऊया.

1. मुस्लिम फॅक्टर

बंगालमध्ये ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या असून ही टीएमसीची हक्काची मतपेढी मानली जाते. मात्र, यावेळी हुमायून कबीर यांच्या आम जनता उन्नयन पार्टीने या मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाले, यावर या निकालाचे गणित अवलंबून आहे.

2. महिला मतदार

महिला मतदार या निवडणुकीत किंगमेकर ठरत आहेत. ममता बॅनर्जींच्या लक्ष्मी भांडार सारख्या योजनांनी महिलांना आर्थिक आधार दिला, तर दुसरीकडे भाजपने संदेशखाली आणि आर. जी. कार यांसारख्या घटनांवरून महिला सुरक्षेचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे महिलांची मते कोणाच्या पारड्यात पडतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अधिक वाचा  पश्चिम बंगालसह 5 राज्यांचे सर्व एक्झिट पोल समोर, येथे आहे काटे की टक्कर येथे उलटफेर तर जनकौल काय?

3. स्थलांतरित मजूर

सध्या लाखो मजूर हे रोजगारासाठी दिल्ली, मुंबईहून पश्चिम बंगालला मतदानासाठी दाखल झाले. या मजुरांची संख्या फार मोठी होती. या तरुणांचा कल नक्की कोणाकडे हे निकालातून स्पष्ट होताना दिसत आहे.

4. मटुआ समाज

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा परिसरात मटुआ समाजाचा मोठा प्रभाव आहे. सीएए (CAA) कायद्याच्या अंमलबजावणीच्या आशेने हा समाज भाजपच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतो. टीएमसीने या समाजाला स्थानिक भावनिक मुद्द्यांच्या आधारे रोखण्याचा प्रयत्न केला.

5. यंत्रणा आणि पारदर्शकता

निवडणूक आयोगाची कडक सुरक्षा आणि मतदार याद्यांमधील बनावट नावे वगळण्यासाठी केलेली विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) मोहीम यामुळे यंदाची निवडणूक अधिक पारदर्शक झाली. भाजपची वाढलेली संघटनात्मक ताकद आणि टीएमसीचे तळागाळातील जाळे यांच्यात ही काटे की टक्कर पाहायला मिळाली.

अधिक वाचा  घोटभर पाण्याची ऐंशी वर्षाच्या वृद्धाची झुंज पाण्यासाठी संघर्ष सुरू? शासकिय योजना अजून किती परीक्षा घेणार?

6. ममता फॅक्टर

ममता बॅनर्जी यांची दीदी ही प्रतिमा टीएमसीची मोठी ताकद आहे. भाजपने यावेळी ममतांवर वैयक्तिक टीका करणे टाळून केवळ धोरणांवर लक्ष केंद्रित केले. हीच रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे.

7. मोदी फॅक्टर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि त्यांच्या सभांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. मोदींनी स्थानिकांशी जोडले जाण्यासाठी केलेले रोडशो आणि साध्या लोकांमध्ये मिसळणे याचा मतदारांवर प्रभाव पडल्याचे दिसत आहे.