मुंबईः विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झालेली आहे. या निवडीनंतर सभागृहात बोलतांना वडेट्टीवार यांनी इमानदारीने जबाबदारी निभावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. २ जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत सत्तापक्षाला साथ दिली. त्यांच्यासोबत ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीला ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना भाजपने चांगली-चांगली खातीही दिली.






अजित पवार यांच्याकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं. तेच सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी झाल्याने राज्याला विरोधी पक्षनेता नव्हता. ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केलं त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड यांचं नाव विरोधी पक्षनेत्यासाठी पुढे करण्यात आलेलं होतं. परंतु संख्येचा विचार केला तर बदलत्या परिस्थितीनुसार काँग्रेसकडे संख्याबळ होतं. त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल, ने निश्चित होतं.
काँग्रेसने परवा विरोधी पक्षनेत्याचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्तावित केलं होतं. त्यानुसार विजय वडेट्टीवार विधान सभेचे विरोधी पक्षनेते झाले आहेत. आज सभागृहात बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, या देशाची समृद्ध परंपरा आहे. अनेक महारुपषांनी देशासाठी जीवाचं रान केलं आहे. पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, मी भुजबळांच्या तालमीमध्ये तयार झालेला मी पैलवान आहे. लढण्यासाठी सत्ता नव्हे तर सामर्थ्य लागतं. या खुर्चीवर असेपर्यंत इमानदारीने काम करणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने २०० आमदार असतांना मला ही संधी मिळालेली आहे.
”या देशाला महापुरुषांच्या त्यागाने समृद्ध केलेलं आहे. महात्मा गांधी बॅरिस्टर झाले परंतु त्यांनी इथल्या जनतेसाठी सुटाबुटातून बाहेर येत साधं राहाणं सुरु केलं. गांधींचं मोठंपण आणि संघर्ष कुणीही टाळू शकणारं नाही.” असं म्हणत त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करणार असल्याचं स्पष्ट केलं.
दरम्यान, काँग्रेसमध्ये असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा होती. त्यानुसार परवा विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात काँग्रेसचे गटनेते राहणार आहेत.











