हवामान विभागाचा मे महिन्याचा अंदाज जाहीर; राज्यात असं तापमान? मान्सूनच्या आगमनाची तारीखही जाहीर

0

पुणे: ‘आयएमडी’च्या विस्तारित अंदाजानुसार, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात (१४ ते २१ मे) हिंदी महासागरावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर वाढण्याची शक्यता असून, याच काळात अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होऊ शकतो. अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख २२ मे आहे. केरळमधील मान्सूनच्या आगमनाची तारीख १५ मेच्या दरम्यान असून, मान्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज मे अखेरीस जाहीर करण्यात येणार आहे.

देशात यंदा एप्रिलमध्ये तीव्र स्वरूपाचा उन्हाळा अनुभवायला मिळाला असला, तरी मे महिन्यात मात्र, कमाल तापमान काहीसे दिलासादायक राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

अधिक वाचा  बारावीचा निकाल काही तासांवर; निकाल येथे पाहता येणार?, A टू Z माहिती

‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मे महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला. एप्रिलअखेरीस महाराष्ट्रासह मध्य आणि उत्तर भारतात सुरू झालेले उष्णतेच्या लाटांचे सत्र चालू आठवड्यात कमी होणार असल्याची शक्यता डॉ. महापात्रा यांनी वर्तवली. ते म्हणाले, ‘मे महिन्यात पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे; तसेच दक्षिण भारतातील वादळी पावसामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानाचे दिवस जास्त राहण्याची शक्यता असल्याने देशाच्या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान जास्त राहिल्याने उकाड्यात मात्र, वाढ होऊ शकते.’

अधिक वाचा  पुणे जिल्ह्याचा ‘गावगाडा’ लांबणीवर! 754 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना थेट दिवाळीचा मुहूर्त?

‘आयएमडी’च्या मासिक हवामान अंदाजानुसार, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यात इतरत्र कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबारपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंतच्या मध्य महाराष्ट्राच्या पट्ट्यात मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहू शकतात.

केरळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

केरळच्या काही भागांत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्याच्या एर्नाकुलम, त्रिशूर, इडुक्की आणि मलप्पुरम या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच, हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. ‘ऑरेंज अलर्ट’ हा अतिमुसळधार पावसाचे संकेत देतो. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात अतिनील किरणांची पातळी उच्च असल्याचे नोंदवले गेले. पतनमथिट्टा जिल्ह्यातील कोन्नी आणि इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथे अतिनील किरणांची पातळी ‘८’ पेक्षा जास्त असल्याचे नोंदवले गेले; ही पातळी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यासाठी पुरेशी मानली जाते.

अधिक वाचा  पुणे महापालिकेत भाजपाची दिशाहीन कारभाराची ‘शंभरी’ नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका