संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रचंड उष्णता! 10 जिल्ह्यांना ‘हिटवेव्ह’चा इशारा या भागात सर्व विक्रम मोडीत; वादळी पावसाचाही इशारा

0

संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून राज्याच्या विविध भागांत सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात स्थिती अत्यंत चिंताजनक असून उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात आतापर्यंत दोन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 46 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक हवालदिल झाले असून, प्रशासनाने दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे कडक आवाहन केले आहे.

10 जिल्ह्यांना ‘हिटवेव्ह’चा इशारा

राज्यातील हवामान सध्या अतिशय गंभीर वळणावर असून आज 10 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील वर्धा आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट अतिशय तीव्र असल्याने तिथे उष्णतेच्या लाटेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे.

अधिक वाचा  सर्वोच्च न्यायालयात ‘फायनल काऊंटडाऊन’ सुरू; शिवसेना कोणाची? ‘या’ तारखेला आरपारची लढाई!

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

उन्हाच्या तडाख्यासोबतच विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तापमानाचे ऐतिहासिक विक्रम मोडीत

या हंगामात विदर्भातील काही शहरांनी उष्णतेच्या बाबतीत गेल्या अनेक दशकांचे रेकॉर्ड मोडले आहेत. रविवारी अकोल्यात या हंगामातील उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोल्याच्या इतिहासातील हे एप्रिल महिन्यातील चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान ठरले आहे. अमरावती येथे 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून 1892 पासूनच्या उपलब्ध नोंदीनुसार 2019 नंतरचे हे सर्वोच्च तापमान आहे. वर्ध्यातही 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून यामुळे 1973 मधील 46.2 अंशांचा विक्रम मोडीत निघाला आहे. याशिवाय यवतमाळमध्येही 46 अंश सेल्सिअससह एप्रिलमधील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे.

अधिक वाचा  भारत जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश बनला; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, ‘या’ शहरात सर्वाधिक श्रीमंत

आज हवामान कसे ?

बुधवारी राज्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता असली, तरी हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40-50 किमी वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाची शक्यता आहे. जरी उद्या कोणत्याही जिल्ह्याला अधिकृतरीत्या ‘हिटवेव्ह’चा इशारा नसला, तरी उन्हाचा चटका कायम राहणार असल्याने खबरदारी घेण्याचे सुचवण्यात आले आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देणे, सुती कपड्यांचा वापर करणे आणि दुपारी शक्यतो सावलीत राहणे प्रवाशांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेसाठी पुण्यात एक जागा ‘फिक्स’ पण जिल्ह्यातील दोन दबंग नेते बिघडवणार शहरातील या चेहऱ्यांचं गणित