अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, युवा नेते पार्थ पवार यांनी भेट घेतली.






दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे राज्यसरकारकडून पत्रव्यवहार केला जाईल आणि ही सर्व चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस सीबीआयमार्फत करु इच्छित आहे त्यासंदर्भात पाऊले उचलली जातील, असे आश्वस्त केल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.
निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
अ) उड्डाण क्रू रचनेत शेवटच्या क्षणी झालेले बदल, ज्यासाठी ऑपरेशनल निर्णय घेण्याची आणि अधिकृततेची तपासणी आवश्यक आहे
ब) हवाई वाहतूक नियंत्रण संप्रेषण आणि धावपट्टीच्या मंजुरीच्या क्रमवारीशी संबंधित स्पष्ट विसंगती
क) ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालीच्या कार्याबाबत चिंता
ड) लँडिंग टप्प्याच्या जवळ असूनही कोणत्याही रेकॉर्ड केलेल्या संकट संप्रेषणांची माहिती नाही
ई) क्रू फिटनेस, देखभाल, अनुपालन आणि विमान प्रणालींसह फॉरेन्सिक मूल्यांकन आवश्यक असलेल्या बाबींची तपासणी
या प्रकरणाचा तपास स्वायत्त यंत्रणा करत आहेत पण सीबीआयचा तपास आणखी व्यापकतेने होऊ शकतो. जे काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सर्व मुद्द्यांचा तपास व्हावा आणि निष्कर्ष लवकरात लवकर काढावा, असं तटकरे म्हणाले.
तटकरे पुढे म्हणाले, सोमवारी पक्षाच्या झालेल्या बैठकीत आमदारांच्या नाराजीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. या सगळ्या कल्पोकल्पीत बातम्या आहेत. आम्ही एकत्रितपणे, एकसंघपणाने विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहोत.











